
मुंबई : नेपाळमध्ये आलेल्या महापुरातील मृतांचा आकडा ११२७ वर पोहोचला आहे, अशी माहिती नेपाळ पोलिसांनी बुधवारी दिली. पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, रासुवा जिल्ह्यात ४५, नुवाकोटमध्ये १५५, धाडिंगमध्ये ५९, चितवनमध्ये ३४८, गोरखामध्ये ६६, तनहुमध्ये ३८, नवलपरासी पूर्वमध्ये २१७ आणि नवलपरासी पश्चिममध्ये १९० मृतदेह सापडले आहेत.
याशिवाय, भारतातही ९ मृतदेह सापडल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली आहे. आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांपैकी फक्त ९५ जणांची ओळख पटली असून, त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये माहिती दिली की, "पुरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणि ओळख न पटलेल्या लोकांच्या मृतदेहांवर कायद्यानुसार आणि शास्त्रीय प्रक्रियेने अंत्यसंस्कार केले जात आहेत. सरकार फक्त अशाच मृतदेहांवर प्रक्रिया करत आहे, ज्यांची ओळख पटलेली नाही. त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने आणि इतर पुरावे जतन केले जात आहेत." ते पुढे म्हणाले, "नेपाळी लष्कर, नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाच्या मदतीने हे काम केले जात आहे. ओळख पटलेल्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवले जात आहेत."
दरम्यान, नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे की, भोटे कोशी नदीला आलेल्या विनाशकारी पुरानंतर गंभीर परिस्थिती असलेल्या जलविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी नेपाळी लष्करासोबत भारत आणि चीनमधील विशेष आंतरराष्ट्रीय बोगदा बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.
काठमांडूमध्ये मंत्रालयाच्या चौथ्या अधिकृत पत्रकार परिषदेत बोलताना, प्रवक्ते आणि सार्वजनिक मुत्सद्देगिरी विभागाचे प्रमुख लोक बहादूर छेत्री यांनी सांगितले की, "अत्यंत जोखमीच्या भूमिगत कामांसाठी आम्ही आंतरराष्ट्रीय तांत्रिक तज्ञांची मदत घेत आहोत. आमचं पहिलं प्राधान्य जीव वाचवणं, हरवलेल्या लोकांना शोधणं, वाचलेल्यांची सुटका करणं, तातडीने मदत पोहोचवणं आणि नेपाळी व परदेशी नागरिकांसह सर्व बाधित लोकांना योग्य ती मदत मिळेल याची खात्री करणं हेच आहे."