
काठमांडू/नुआकोट (१ सप्टेंबर): नेपाळमध्ये आलेल्या महापुराचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एक हिरव्या रंगाचं घर पाण्याच्या लोंढ्यात एकटंच उभं आहे. आजूबाजूची सगळी घरं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, पण हे ४० वर्षे जुनं घर जागचं हललं नाही. यामागचं रहस्य आता समोर आलं आहे.
नेपाळच्या त्रिशूली नदीला आलेल्या पुरामुळे हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. २६ ऑगस्टला आलेल्या या प्रलयात नुआकोट जिल्ह्यात मोठं नुकसान झालं. डोळ्यादेखत घरं, गाड्या आणि लोकांचं सामान वाहून गेलं. पण या सगळ्यात तीन मजली हिरव्या रंगाचं घर मात्र दिमाखात उभं राहिलं.
या घराचे मालक आहेत प्रकाश. त्यांच्यासाठी हा एक चमत्कारच आहे. पुराचं पाणी घरात शिरून वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचू लागलं, तेव्हा आपलं आयुष्य संपलं असंच त्यांना वाटलं होतं. "आता आपले शेवटचे क्षण आलेत असं वाटत होतं. कदाचित आमचं आयुष्य इतकंच होतं, असं मी समजलो होतो," असं प्रकाश यांनी त्या क्षणांची आठवण सांगताना म्हटलं.
तर दुसरीकडे, प्रकाश यांच्या पत्नी लक्ष्मी पांडे सांगतात की, हे सगळं देवाच्या कृपेमुळे झालं. "आम्ही रोज देवाची पूजा करतो. देवावर आमचा विश्वास आहे. त्यामुळेच देवाने आम्हाला वाचवलं. जेव्हा आम्ही पाण्यात अडकलो होतो, तेव्हा मी प्रत्येक क्षणी 'ओम नमः शिवाय' म्हणत होते. मी रोज हनुमान चालीसा वाचते. त्या दिवशीही हनुमान चालीसा वाचूनच दुकानात गेले होते. देवानेच आमचं रक्षण केलं," असं त्या म्हणाल्या.
पाणी सतत वाढत होतं, त्यामुळे कुटुंबाला वरच्या मजल्यांवर पळावं लागलं. प्रकाश जवळच्या दुकानात असताना त्यांना पाणी वाढत असल्याची माहिती मिळाली. ते लगेच घरी धावले आणि कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी जायला सांगितलं. पण काही मिनिटांतच परिस्थिती हाताबाहेर गेली. बाहेर पाहिलं तर त्यांची गाडी पाण्याच्या लोंढ्यात उलटताना दिसली. ते लगेच घरात परतले.
घरात प्रकाश यांच्यासह कुटुंबातील पाच सदस्य होते. ते आधी चौथ्या मजल्यावर गेले, पण पाणी तिथेही पोहोचल्यावर त्यांना थेट गच्चीवर जावं लागलं. या सगळ्यात, शाळेत गेलेल्या मुलाची प्रकाश यांना खूप काळजी वाटत होती. "आम्ही सगळे एकत्र होतो, पण मुलगा शाळेत होता. आम्हाला काही झालं तर त्याचं काय होईल, हाच विचार मनात येत होता," असं ते सांगतात.
Laxmi Pandey, owner of the viral 'miracle house' that survived the disastrous Nepal floods:
I prayed to Lord Shiva and i recite Hanuman Chalisa daily! That day i recited hanuman chalisa! I feel god protected our house!
And now, Barkha Dutt is devastated!pic.twitter.com/b9K5lfSzT3— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) September 1, 2026
आजूबाजूच्या नवीन इमारती वाहून गेल्या, पण हे हिरवं घर कसं वाचलं, हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. याचं श्रेय प्रकाश घराच्या मजबूत पायाला आणि बांधकामाच्या दर्जाला देतात. "हे जवळपास ४० वर्षे जुनं घर आहे. त्या काळातलं सिमेंट आणि बांधकाम साहित्य खूप चांगलं होतं. शिवाय, घर नदीच्या अगदी जवळ असल्यामुळे आम्ही पाया मजबूत करण्यासाठी खूप खर्च केला होता. सुरक्षेसाठी पायाखाली दोन ते तीन थर रोड मटेरियल वापरून तो पक्का केला होता," असं प्रकाश यांनी सांगितलं.
घराच्या मालकीण लक्ष्मी पांडे यांनी 'एएनआय'ला सांगितलं, "आम्हाला जणू दुसरा जन्म मिळाला आहे. याआधी नेपाळमध्ये भूकंप झाला होता, तेव्हाही मोठमोठे धक्के बसले आणि आजूबाजूची घरं पडली होती. तेव्हाही शेजाऱ्यांनी आम्हाला वाचवलं होतं."
कुटुंब जवळपास दीड ते दोन तास गच्चीवर अडकलं होतं. पाण्याची पातळी थोडी कमी झाल्यावर, जवळच्या टोलनाक्यावरील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. दोन इमारतींमध्ये एक मोठा पाईप टाकून आणि दोरीच्या साहाय्याने प्रकाश यांच्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
घराच्या तळमजल्यावर असलेलं गोदाम आणि किराणा दुकान पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. दोन गाड्या, बाईक आणि स्कूटर पाण्यात वाहून गेल्या आहेत. "मालमत्ता, दुकानातलं सामान वाहून गेलं किंवा मातीत गाडलं गेलं. पण माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण जिवंत आहे, हे महत्त्वाचं. सध्या आम्ही काठमांडूमध्ये राहत आहोत," असं प्रकाश म्हणाले.
नुआकोटहून रसुवाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभं असलेलं हे हिरवं घर आता पुराच्या भीषणतेची साक्ष देत आहे. रस्ते पूर्णपणे खराब झाले असून वाहतूक थांबली आहे. गाडी जिथपर्यंत पोहोचते, तिथून १.२५ किलोमीटर चालत जावं लागतंय. सध्या नेपाळचं सैन्य या भागात बचाव आणि मदतकार्य करत आहे. सगळं काही गमावूनही प्रकाश यांचं कुटुंब म्हणतंय, "आम्ही पुन्हा शून्यातून आमचं आयुष्य उभं करू."