
Oman Oil Tanker Attack : मिडल ईस्टमध्ये पुन्हा एकदा संघर्षाचे वातावरण तीव्र होत असताना त्याचे पडसाद आता भारतीय नागरिकांवरही उमटू लागले आहेत. आखाती समुद्र क्षेत्रात भारतीय नाविक कार्यरत असलेल्या व्यापारी जहाजांवर सलग हल्ले झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. विशेषतः ओमानच्या किनाऱ्याजवळ झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय नाविकांचा मृत्यू झाल्याने भारत सरकारने तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित घटनेचा कठोर निषेध नोंदवला आहे.
गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारतीय नाविकांच्या सुरक्षेला भारत सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांत मिडल ईस्ट परिसरात भारतीय खलाशांशी संबंधित अनेक गंभीर घटना घडल्या असून त्याबाबत भारत सरकार सतत लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.
जयस्वाल यांनी म्हटले की, भारतीय नागरिकांचा जीव गमवावा लागलेल्या या हल्ल्याची भारताने कठोर शब्दांत निंदा केली आहे. या संदर्भात भारताने अमेरिकेच्या प्रभारी राजनैतिक अधिकाऱ्यांनाही (CDA) बोलावून आपला निषेध नोंदवला आहे.
ओमानच्या किनाऱ्याजवळील एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर सुरुवातीला तीन भारतीय नाविक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. मात्र नंतर त्यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी झाली. या घटनेमुळे भारतीय नाविकांच्या सुरक्षेबाबत नवी चिंता निर्माण झाली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, या भागात व्यापारी जहाजांवर होत असलेले हल्ले हे सुरू असलेल्या प्रादेशिक संघर्षाचे थेट परिणाम आहेत. त्यामुळे संबंधित पक्षांनी संयम बाळगत संघर्ष कमी करण्यासाठी राजनैतिक मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहनही भारताने केले आहे.
गेल्या काही दिवसांत भारतीय खलाशी असलेल्या तीन वेगवेगळ्या जहाजांना लक्ष्य करण्यात आले आहे. 8 जून रोजी 'मॅरिवेक्स' या जहाजावर आग लागल्याची घटना घडली होती. या जहाजावर एकूण 24 भारतीय कर्मचारी कार्यरत होते. सुदैवाने सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर 10 जून रोजी 'एमटी सेटेबेलो' या जहाजावर हल्ला करण्यात आला. या जहाजावरही 24 भारतीय नाविक होते. हल्ल्यानंतर 21 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली, मात्र तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला.
#WATCH | Delhi | Three Indian seafarers have died in an attack on the Palau-flagged MT Settebello off the coast of Oman and near the Strait of Hormuz
MEA Spox Randhir Jaiswal says, "When this particular attack happened on Palau-flagged MT Settebello, we lodged a strong protest… pic.twitter.com/DVaiAoshzw— ANI (@ANI) June 11, 2026
11 जून रोजी आणखी एका घटनेत 'एमटी जलवीर' या जहाजाला लक्ष्य करण्यात आले. या जहाजावर 20 भारतीय नाविक कार्यरत होते. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. मात्र अल्पावधीतच भारतीय नाविक असलेल्या अनेक जहाजांवर हल्ले झाल्याने समुद्री सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, या भागातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक व्यापार आणि समुद्री वाहतुकीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सर्व संबंधित देशांनी तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि कूटनीतीचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. भारताने पुन्हा एकदा या भागात शांतता, स्थैर्य आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.