
नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये कर्तव्य पथावर जेव्हा आपले सैनिक थरारक स्टंट्स करतात, तेव्हा त्यांच्या धाडसासोबतच आणखी एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधून घेतं, ती म्हणजे रॉयल एनफिल्ड बुलेटचा दमदार आवाज. भारतीय सैन्य आणि 'बुलेट' यांचं नातं केवळ एक वाहन आणि रायडरपुरतं मर्यादित नाही. हे नातं आहे देशभक्ती, विश्वास आणि अनेक दशकांच्या अभिमानाचं.
१९४७-४८ मध्ये पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धानंतर, काश्मीरच्या बर्फाळ आणि खडकाळ, अवघड रस्त्यांवर गस्त घालण्यासाठी सैन्याला एका मजबूत आणि विश्वासार्ह मोटरसायकलची गरज होती. सरकारने बाईक निवडण्यासाठी तीन मुख्य अटी ठेवल्या होत्या.
१. लडाख आणि काश्मीरच्या उंच ठिकाणांवर बाईक सहज चढली पाहिजे.
२. जोराच्या वाऱ्यातही बॅलन्स सांभाळण्यासाठी बाईक वजनाने भारी असावी.
३. तिची देखभाल सोपी असावी आणि ती जास्त काळ टिकणारी असावी.
त्या काळात, रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० या बाईकमध्ये ४-स्ट्रोक इंजिन आणि आधुनिक 'स्विंगआर्म सस्पेन्शन' होतं, जे इतर बाईक्सच्या तुलनेत खूपच प्रगत होतं. सैन्याच्या कठीण चाचण्यांमध्ये ही बाईक पूर्णपणे यशस्वी ठरली. त्यामुळे, १९५२ मध्ये भारत सरकारने ब्रिटिश रॉयल एनफिल्ड कंपनीला ८०० 'बुलेट ३५०' बाईक्सची ऑर्डर दिली. या बाईक्स १९५३ मध्ये भारतात पोहोचल्या.
सुरुवातीला या बाईक्स थेट ब्रिटनमधून आयात केल्या जात होत्या. पण, वाढती मागणी पाहता १९५५ मध्ये इंग्लंडच्या रॉयल एनफिल्ड आणि भारतातील 'मद्रास मोटर्स' यांनी मिळून 'एन्फिल्ड इंडिया' या कंपनीची स्थापना केली. चेन्नईच्या तिरुवोट्टियूरमध्ये याचा प्लांट सुरू झाला.
सुरुवातीला बाहेरून पार्ट्स आणून इथे बाईक एकत्र (Assemble) केली जायची. पण १९६२ पर्यंत बुलेट बाईक पूर्णपणे भारतातच तयार होऊ लागली. काही वर्षांनी इंग्लंडमधील मूळ कंपनी बंद पडली, तेव्हा भारतीय कंपनीने 'रॉयल एनफिल्ड'चे हक्क विकत घेतले आणि आज हा ब्रँड जागतिक स्तरावर मोठा झाला आहे.
अनेक दशकांपासून सीमेचं रक्षण करणाऱ्या बुलेटसोबतच, आजच्या काळात भारतीय सैन्यात आधुनिक गरजांनुसार नवीन वाहनांचाही समावेश करण्यात आला आहे:
बुलेट ३५० आणि क्लासिक ५०० व्यतिरिक्त, आता सैन्यात हिमालयन, टीव्हीएस अपाचे आणि हीरो जीएस १५०आर या बाईक्सचाही वापर होतो. तरीही, 'डेअरडेव्हिल्स' आणि 'टॉरनॅडोज' यांसारख्या सैन्याच्या स्टंट टीम्स आजही आपल्या शोसाठी बुलेटवरच विश्वास ठेवतात.
एकेकाळची आयकॉनिक 'मारुती जिप्सी' आता सेवेतून निवृत्त होत असून, तिच्या जागी टाटा सफारी स्टॉर्म (GS800), महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक आणि फोर्स गुरखा यांसारख्या दमदार ४×४ एसयूव्ही आल्या आहेत.
शस्त्रसज्ज वाहनं
युद्धक्षेत्रासाठी स्वदेशी बनावटीची टाटा डब्लूएचएपी (WhAP), महिंद्रा एएलएसव्ही (ALSV) आणि कल्याणी एम४ (M4) यांसारखी शक्तिशाली चिलखती वाहनं वापरली जात आहेत. पण सीमेवर गस्त घालणाऱ्या जवानाच्या बुलेटचा तो दमदार आवाज आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करतो.