
नवी दिल्ली : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या महान प्रवासाची सुरुवात एका काश्मिरी विलो बॅटने झाली होती. ही त्याची पहिली बॅट होती, जी त्याच्या बहिणीने आणि घरच्यांनी त्याला भेट दिली होती. याच काश्मिरी विलो बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांवर शतकं ठोकत त्याने इतिहास रचला. पण आता, ज्या उद्योगाने सचिनसारखा स्टार घडवायला मदत केली, तोच उद्योग आज मोठ्या संकटात आहे. लाकडाच्या आणि इतर कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे काश्मिरी विलो बॅट कंपन्या मोठ्या अडचणीत आल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये अनेक बॅट कंपन्या सुरू झाल्या आहेत. पण मूळ काश्मिरी विलो कंपनी सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशांतील दिग्गज क्रिकेटपटूंनीही इथल्या बॅट वापरल्या आहेत. पण आता इतक्या कंपन्यांमुळे लाकडाची मागणी प्रचंड वाढली आहे. या बॅट काश्मीरमध्ये आढळणाऱ्या 'सॅलिक्स अल्बा' (Salix alba) नावाच्या विशिष्ट झाडाच्या लाकडापासून बनवल्या जातात. कंपन्या या झाडांचा अतिवापर करत आहेत, अगदी लहान झाडंही तोडली जात आहेत. त्यात भर म्हणजे, जुन्या झाडांच्या जागी नवीन झाडं लावण्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये. यामुळे कच्च्या मालाचा तब्बल ४० टक्के ते ५० टक्के तुटवडा निर्माण झाला आहे, ज्यामुळे काश्मिरी विलो बॅट उद्योग अडचणीत आला आहे.
क्रिकेटच्या जगात इंग्लिश विलो बॅट्स खूप लोकप्रिय आहेत, पण त्या खूप महागड्याही असतात. याउलट, काश्मिरी विलो बॅट हा एक उत्तम आणि उच्च दर्जाचा पर्याय म्हणून समोर आला, तोही खूप कमी किमतीत. त्यामुळेच अनेक देशांतील क्रिकेटपटूंनी या बॅट्स वापरायला सुरुवात केली.
परिस्थिती आणखी बिकट होण्याचं कारण म्हणजे, 'सॅलिक्स अल्बा' झाडांची अवैधपणे तोड करून प्लायवूडसारख्या इतर कामांसाठी तस्करी केली जात आहे. याचा थेट फटका प्रतिष्ठित काश्मिरी विलो ब्रँडसह सर्व बॅट बनवणाऱ्या कंपन्यांना बसत आहे. सचिन तेंडुलकरने स्वतः अनेकदा त्याच्या पहिल्या काश्मिरी विलो बॅटबद्दल सांगितलं आहे. त्याच्या बहिणीने त्याला ही बॅट कशी गिफ्ट दिली आणि तिथून त्याचा क्रिकेटचा प्रवास कसा सुरू झाला, याच्या आठवणी तो नेहमी सांगतो.
२०२४ मध्ये काश्मीरच्या दौऱ्यावर असताना सचिनने एका बॅट बनवण्याच्या फॅक्टरीलाही भेट दिली होती. तिथे त्याने आपल्या पहिल्या बॅटबद्दल आणि कंपनीसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.