भाईंदर स्थानकाचा थांबा चुकवला! विरार-चर्चगेट १५ डबा लोकल दोन किमी पुढे थांबली; संतप्त प्रवाशांनी एसी लोकल रोखली

Published : Apr 09, 2026, 08:30 AM IST
Mumbai Local

सार

Mumbai Local : पश्चिम रेल्वेच्या विरार-चर्चगेट १५ डबा लोकलने भाईंदर स्थानकाचा थांबा चुकवल्याने मोठा गोंधळ उडाला. लोकल दोन किलोमीटर पुढे थांबल्याने प्रवाशांनी रुळांवरून चालत स्थानक गाठले. संतप्त प्रवाशांनी एसी लोकल रोखून धरत प्रवासाची मुभा मिळवली. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Mumbai Local : पश्चिम रेल्वे मार्गावर बुधवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या १५ डबा जलद लोकलने भाईंदर स्थानकाचा नियोजित थांबा चुकवला. ही लोकल तब्बल दोन किलोमीटर पुढे जाऊन थांबल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आणि काही काळ स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याबद्दलचे वृत्त महाराष्ट्र टाइम्स यांनी दिले आहे. 

लोकलने थांबा चुकवल्याने प्रवाशांचा संताप

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजून ४४ मिनिटांनी विरारहून दादरकडे निघालेल्या या लोकलला वसई रोड, भाईंदर, दहिसर, अंधेरी आणि दादर असे थांबे होते. वसई रोड स्थानकानंतर लोकल वेगाने धावत असताना मोटरमनच्या लक्षात न येता भाईंदरचा थांबा चुकला. चूक लक्षात येताच लोकल थांबवण्यात आली, मात्र तोपर्यंत स्थानक बरेच मागे गेले होते.

रुळांवरून चालत प्रवाशांनी गाठले स्थानक

लोकल स्थानकापुढे थांबल्यानंतर अनेक प्रवाशांनी थेट रुळांवर उतरून पायपीट करत भाईंदर स्थानक गाठले. ही घटना अत्यंत धोकादायक असून रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे.

एसी लोकल रोखून धरली

दरम्यान, भाईंदर स्थानकावर जलद लोकलची वाट पाहत असलेले प्रवासी आधीच नाराज होते. जलद लोकल न थांबल्याने संतापलेल्या प्रवाशांनी विरार-चर्चगेट एसी लोकल काही काळ रोखून धरली. “आमच्याकडे एसी लोकलचा पास नाही, पण वेळेवर कामावर पोहोचणे गरजेचे आहे,” अशी भूमिका प्रवाशांनी मांडली.

प्रवाशांना एसी लोकलमधून प्रवासाची मुभा

परिस्थिती तणावपूर्ण होताच रेल्वे प्रशासनाने हस्तक्षेप केला. अखेर प्रवाशांना एसी जलद लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि गाड्यांची वाहतूक सुरळीत झाली.

चौकशीचे आदेश

या संपूर्ण प्रकाराची दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने विरार-दादर १५ डबा लोकलने भाईंदर थांबा का चुकवला, याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Water Cut News: मुंबईकरांनो लक्ष द्या! 'या' भागातील पाणीकपात अखेर संपली; पाहा तुमच्या नळाला पाणी कधी येणार?
नाशिककरांची चंगळ! आता मुंबई-धनबाद एक्स्प्रेस नाशिक रोडवर थांबणार; प्रवाशांना मोठा दिलासा