
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नुकतीच पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे यांनी पक्षातील मतभेद, जयंत पाटलांसोबत भेटीच्या चर्चा आणि डिमिलिटेशन बिल यासंदर्भातील काही मुद्द्यांवर भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरण, अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. याशिवाय पक्षात कोणताही अविश्वास किंवा गैरसमज नसल्याचा दावाही सुनील तटकरे यांनी केला आहे. तसेच सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, जयंत पाटील यांच्यासोबत अलीकडे कोणतीही भेट झालेली नाही. पक्षात अविश्वासाचे वातावरण असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये होत असल्या तरी त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली. यावर तटकरे म्हणाले की, या चर्चांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेच पूर्णविराम दिला आहे. विलीनीकरणाचा विषय नवीन नसून अजित पवार यांच्यासोबत असतानाही अशा चर्चा होत होत्या, असे त्यांनी नमूद केले.
संसदेत येऊ घातलेल्या डिमिलिटेशन विधेयकांबाबतही सुनील तटकरे यांनी भाष्य केले. तटकरे म्हणाले की, एखाद्या विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे NDAमध्ये सहभागी होणे असा त्याचा अर्थ होत नाही. कोणत्या मुद्द्यावर भूमिका घ्यायची हे प्रत्येक पक्षाचे स्वतंत्र धोरण असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नियमित भेटी होत असतात. पण अर्थखात्याशी संबंधित काही विषयांवर फडणवीसांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती सुनील तटकेरींनी दिली.
आपल्या मतदारसंघातील दौरे आणि राजकीय समन्वयाबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, सुनेत्रा पवार यांना त्यांच्या मतदारसंघातील सर्व घडामोडींची माहिती असते. तसेच अजित पवार यांच्यासोबत जसे ट्युनिंग होते, तसेच सुसंवाद सुनेत्रा पवार यांच्यासोबतही असल्याचे त्यांनी सांगितले.
डिलिमिटेशन किंवा अन्य विधेयकांबाबत शरद पवार कोणाला समर्थन देतात हा त्यांचा वैयक्तिक आणि पक्षीय निर्णय आहे. यावर सुनील तटकरेंनी अधिक बोलणेही टाळले.