
मुंबई : मुंबईतील H-पूर्व (H-East) आणि K-दक्षिण (K-South) विभागातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC) 2,400 मिमी व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे येत्या 11 ऑगस्ट सकाळी 10 वाजल्यापासून 12 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपर्यंत काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
11 ऑगस्ट ते 12 ऑगस्टदरम्यान H-पूर्व विभागातील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, हँगर कर्मचारी वसाहत, एअर इंडिया कॉलनी, सांताक्रूझ (पूर्व), वांद्रे रेल्वे टर्मिनस आणि वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.तसेच 12 ऑगस्ट रोजी सांताक्रूझ (पूर्व), खार (पूर्व) आणि वांद्रे (पूर्व) येथील काही भागांमध्येही पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
K-दक्षिण विभागातील कबीर नगर, बामणवाडा, पारशीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, मासळी बाजार, घाटीवाडा, चकाला आणि P&T वसाहत या भागांत 11 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत कोलडोंगरी, ओल्ड पोलीस लेन, विजय नगर (सहार रोड) आणि मोगरापाडा येथे कमी दाबाने पाणी मिळणार आहे.
देखभाल कामामुळे 12 ऑगस्ट रोजी पहाटे 5 ते सकाळी 8 या वेळेत सहार गाव, सुतार पाखाडी आणि कार्गो संकुल परिसरातही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना काही काळ पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
देखभाल कामामुळे पाणीपुरवठ्यावर तात्पुरता परिणाम होणार आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढे पाणी आधीच साठवून ठेवावे आणि त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.