
Mumbai : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्याने शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. तब्बल अडीच दशकांहून अधिक काळ मुंबईवर वर्चस्व राखणाऱ्या ठाकरे गटाला यंदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असतानाच, या पराभवाच्या धक्क्यातून सावरत असतानाच ठाकरे गटासाठी आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे.
या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मुंबईत केवळ ६५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मुंबई महापालिकेवर दीर्घकाळ सत्ता गाजवणाऱ्या ठाकरे गटासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे भाजपने सर्वाधिक जागा जिंकत मुंबईच्या राजकारणात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
निवडणूक निकालानंतर काही तासांतच ठाकरे गटासाठी आणखी एक अत्यंत दुःखद घटना घडली. शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार आणि ज्येष्ठ नेत्या नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. रात्री सुमारे १० वाजता त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ उपचार मिळण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या काळात राजकारणात महिलांचा सहभाग अत्यंत मर्यादित होता, त्या काळात स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना संधी दिली. त्या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या. तसेच विधान परिषदेच्या सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.
मुंबईतील निवडणूक निकालामुळे आधीच निराशेच्या छायेत असलेल्या ठाकरे गटावर नीला देसाई यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. पराभवाची सल आणि अनुभवी नेत्या गमावण्याचे दुःख, असा दुहेरी आघात ठाकरे गटाला सहन करावा लागत आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नीला देसाई यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुमारे ५२.९४ टक्के मतदान झाले. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी किमान ११४ जागांची आवश्यकता असून, यंदा राजकीय समीकरणे पूर्णतः बदललेली पाहायला मिळाली.
या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत युती केली होती, तर या आघाडीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता. दुसरीकडे, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आक्रमक प्रचार करत पूर्ण ताकद लावली. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढली, तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युतीत उतरली होती.