
मुंबई : मुंबईतील उघडी, तुटलेली किंवा गायब झालेली नाल्यांची झाकणे नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरतात. यासंदर्भात वारंवार महापालिकेकडे तक्रार दाखल केली जाते. तरीही काही तक्रारींचे निवारण होते तर काहींचे होत नाही. अशातच महापालिकेकडून अद्याप मुंबईतील जवळजवळ शेकडोहून अधिक उघड्या नाल्यांच्या झाकणासंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यात आलेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
पावसाळ्यात उघडी किंवा तुटलेली नाल्यांची झाकणे नागरिकांसाठी जीवघेणी ठरू शकतात. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने तक्रारी नोंदवण्यासाठी विशेष क्रमांक उपलब्ध करून दिला होता. या क्रमांकावर मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिकेकडे आतापर्यंत 190 तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र त्यापैकी केवळ काही तक्रारींचेच निवारण झाले आहे. यापैकी अजून 179 तक्रारी प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील पावसात उघड्या किंवा तुटलेल्या झाकणांमुळे अपघात होऊ शकतात. खासकरुन रात्रीच्या वेळी आणि पाण्याखाली झाकणे दिसत नसल्याने नागरिकांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अलीकडेच अंधेरीत मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.