
Mumbai LPG Shortage : मुंबई शहरात सध्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या टंचाईमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगात मोठी चिंता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत गॅस पुरवठ्यात अचानक कपात झाल्याने अनेक उपाहारगृहांचे किचन चालवणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती तातडीने सुधारली नाही तर पुढील 48 तासांत शहरातील अनेक हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील हॉटेल संघटनांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात 10 ते 20 टक्क्यांची घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून मिळणारा पुरवठा विस्कळीत झाल्याने वितरकांकडे मागणी करूनही वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे दररोज हजारो ग्राहकांना सेवा देणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या टंचाईमागे जागतिक आणि स्थानिक अशा दोन्ही कारणांचा प्रभाव असल्याचे सांगितले जात आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आयातीचा मार्ग काही प्रमाणात विस्कळीत झाला आहे. भारतातील मोठ्या प्रमाणातील एलपीजी आयात याच मार्गाने होत असल्याने त्याचा परिणाम पुरवठ्यावर झाला आहे. दुसरीकडे घरगुती सिलेंडरच्या वाढत्या मागणीमुळे तेल कंपन्यांनी व्यावसायिक पुरवठ्यापेक्षा घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे.
AHAR या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबईसह आसपासच्या शहरांमध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा वाढत आहे. यामुळे काळाबाजार वाढण्याची शक्यता असून किंमती वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. अनेक लहान हॉटेल मालकांकडे गॅसचा अतिरिक्त साठा नसतो. त्यामुळे त्यांना दररोजच्या डिलिव्हरीवर अवलंबून राहावे लागते. पुरवठा असेच विस्कळीत राहिल्यास कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्च भागवणेही कठीण होईल, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
गॅस टंचाईचा सामना करण्यासाठी अनेक हॉटेल्सनी तात्पुरते उपाय सुरू केले आहेत. जास्त वेळ शिजवावे लागणारे पारंपरिक पदार्थ काही ठिकाणी बंद करण्यात आले आहेत. तसेच काही रेस्टॉरंट्स दुपारी 3 ते 7 या वेळेत किचन बंद ठेवून गॅसची बचत करत आहेत. काही ठिकाणी इंडक्शन स्टोव्ह किंवा इलेक्ट्रिक ओव्हनचा वापर वाढवण्यात आला आहे, मात्र यामुळे वीज बिल वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.