
एका परदेशी पर्यटकाने मुंबई शहरातील पायाभूत सुविधांचं, विशेषतः नुकत्याच सुरू झालेल्या 'अॅक्वा लाईन' मेट्रोचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पण त्याचवेळी त्याने शहरातील एक विदारक सत्यही समोर आणलं आहे - ते म्हणजे इथले अस्वच्छ समुद्रकिनारे आणि स्वच्छतेचा अभाव. ली कुआन यिम्बी नावाच्या या पर्यटकाने X वर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने म्हटलंय की तो नुकताच मुंबईला येऊन गेला आणि इथली प्रगती पाहून तो प्रभावित झाला.
"मुंबईचा समुद्रकिनारा जगातल्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असायला हवा," असं त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
त्याने पुढे लिहिलं, "मी नुकताच मुंबईत होतो आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत होत असलेल्या प्रगतीसाठी त्यांचं कौतुक करायलाच हवं. नवी अॅक्वा लाईन मेट्रो तर अप्रतिम आहे." पण, त्याचवेळी त्याने स्वच्छता आणि साफसफाईच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. तो म्हणाला, "भारताला अजूनही स्वच्छतेच्या बाबतीत खूप काम करण्याची गरज आहे. हे तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय समजू शकत नाही."
त्याने याकडे लक्ष वेधलं की मुंबई समुद्राकिनारी वसलेलं शहर असूनही, लोकांना समुद्राच्या पाण्याचा आनंद घेता येत नाही. "समुद्रकिनारे कचऱ्याने भरलेले आहेत, पाणी प्रचंड प्रदूषित आहे आणि बाहेर कडक ऊन असूनही जवळजवळ कुणीही समुद्रात पोहत नाही. किनाऱ्यावर चालताना फक्त चिखल, कचरा आणि क्षितिजावर दिसणारं गढूळ पाणी दिसतं. जगात अशी अनेक गरीब ठिकाणं आहेत, जिथे लोक अजूनही समुद्रकिनाऱ्यांचा वापर करू शकतात."
I was just in Mumbai, and I have to give them credit for the progress they’re making on infrastructure. The new Aqua Line metro is phenomenal. But the amount of work India still has to do on basic cleanliness and sanitation and it is hard to understand until you see it yourself.… https://t.co/u6CbRjThkm pic.twitter.com/pXiY37DhrE
— Lee Kuan Yimby (@LeeKuanYimby) August 22, 2026
त्याने पुढे असंही म्हटलं की, ही समस्या पैशांच्या अभावामुळे नाही, तर अनेक दशकांपासून कचरा संकलन आणि सांडपाणी प्रक्रियेकडे झालेलं दुर्लक्ष आणि नियमांची अंमलबजावणी न झाल्यामुळे आहे. "सध्या या समस्येची व्याप्ती इतकी मोठी आहे की ती अशक्य वाटते. भारताच्या या कचऱ्याची किंमत जगभरातील महासागरांना चुकवावी लागत आहे. मोदी देशाला ज्या दिशेने नेत आहेत ते मला आवडतं, पण भारताने स्वच्छतेला 'राष्ट्रीय आपत्कालीन मोहीम' म्हणून हाताळायला हवं."
त्याने छोट्या-छोट्या मोहिमांऐवजी 'मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम' राबवण्याचा सल्ला दिला. लोकांना कचरा उचलण्यासाठी, गटारं साफ करण्यासाठी, समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी आणि सार्वजनिक जागांची चांगल्या उपकरणांनी देखभाल करण्यासाठी पगारी नोकऱ्या निर्माण करण्याचा प्रस्तावही त्याने मांडला.
"भारताने दाखवून दिलं आहे की तो मेट्रो, विमानतळं, महामार्ग आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारू शकतो. स्वच्छ रस्ते आणि वापरण्यायोग्य पाण्यालाही पायाभूत सुविधा मानलं पाहिजे," असं त्याने लिहिलं. "मुंबईचा समुद्रकिनारा जगातल्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक असायला हवा. पण त्याऐवजी, तो शहराचा एक बिनमहत्त्वाचा भाग बनला आहे, जो सांडपाणी आणि कचऱ्याच्या हवाली केला गेला आहे."