
Mumbai : भारतीय तरुणांना परदेशात चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांची मानवी तस्करी करणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सीबीआयने भंडाफोड केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील नेल्लाथू रामकृष्णन उर्फ ‘कृष’ याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. म्यानमारमधील सायबर गुन्हेगारी केंद्रांमध्ये भारतीयांना गुलामासारखे ठेवून त्यांच्याकडून फसवणूक करून घेतल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे रॅकेट भारतातील सुशिक्षित तरुणांना थायलंडमध्ये उच्च पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवत असे. पीडितांना प्रथम दिल्ली आणि नंतर बँकॉकमार्गे थायलंडमध्ये नेले जाई. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर त्यांना गुपचूप म्यानमारमधील ‘म्यावाडी’ परिसरातील सायबर फसवणूक केंद्रांमध्ये हलवले जात होते.
म्यानमारमध्ये पोहोचल्यानंतर या तरुणांना अक्षरशः कैदेत ठेवले जात होते. त्यांना “डिजिटल अरेस्ट”, रोमांस फ्रॉड आणि क्रिप्टो फसवणुकीसारखे गुन्हे करण्यास भाग पाडले जात होते. या कामास नकार देणाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता. काही पीडितांनी या परिस्थितीला ‘नरक’ असे संबोधले आहे.
२०२५ मध्ये काही पीडितांनी जीव धोक्यात घालून या कैदेतून पलायन केले. ते थायलंडमार्गे भारतात परतले आणि त्यांनी संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. त्यांच्या तक्रारीनंतर सीबीआयने तपास सुरू करून या रॅकेटचा माग काढला.
सुनील उर्फ ‘कृष’ भारतात परतल्याची माहिती मिळताच सीबीआयने सापळा रचून त्याला मुंबईत अटक केली. त्याच्या घरातून लॅपटॉप, मोबाईलसह मोठ्या प्रमाणात डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या पुराव्यांच्या आधारे या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहेत, याचा तपास सुरू आहे.
सीबीआयच्या प्राथमिक तपासात ‘कृष’ हा या मानवी तस्करीच्या जाळ्याचा प्रमुख दलाल आणि किंगपिन असल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण-पूर्व आशियातील विविध देशांमध्ये भारतीयांची बेकायदेशीर वाहतूक आणि त्यांचे शोषण करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. आता या प्रकरणातील इतर आरोपी आणि परदेशी नागरिकांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.