
BMC election 2026 Mumbai mayor election : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा पेच आता एका अशा वळणावर येऊन ठेपला आहे, ज्याची कल्पना कदाचित महिनाभरापूर्वी कुणीही केली नसेल. २५ वर्षांची ठाकरेंची सत्ता उलथवून लावल्यानंतर भाजप जल्लोष करत असतानाच, आता महापौर निवडीच्या प्रक्रियेत असे काही ‘ट्विस्ट’ समोर येत आहेत की, ज्यामुळे राजकारणातील जुनी समीकरणे पुन्हा एकदा जिवंत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निवडणुकीत भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. कागदावर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्याकडे ११८ जागांचे स्पष्ट बहुमत दिसत असले, तरी पडद्यामागे वेगळीच खिचडी शिजत असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मातोश्री आणि सागर बंगल्यामध्ये (देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान) संवादाचे पूल पुन्हा बांधले जात आहेत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील ही कथित चर्चा केवळ महापौरपदापुरती मर्यादित नसून, ती एकनाथ शिंदेंना सत्तेच्या परिघाबाहेर ठेवण्यासाठीची खेळी असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे २९ नगरसेवक आहेत, जे सत्तेसाठी निर्णायक आहेत. मात्र, महापौरपदावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये सुरू असलेली रस्सीखेच आता शिंदेंसाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. त्यातच, ‘मुंबईची सत्ता दिल्लीतून नियंत्रित व्हावी’ या दिल्लीश्वरांच्या इच्छेमुळे शिंदेंना बाजूला सारून थेट ठाकरेंच्या मदतीने भाजप आपला महापौर बसवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर हे समीकरण जुळले, तर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी सर्वात मोठा राजकीय धक्का असेल.
या संपूर्ण नाट्यात सर्वात महत्त्वाची ठरणार आहे ती ठाकरे गटाची भूमिका. रणनीती अशी आखली जात आहे की, महापौर निवडीच्या प्रत्यक्ष मतदानावेळी उद्धव ठाकरे यांचे ६५ नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहू शकतात.
याचे गणित साधे आहे:
एक दुसरे समिकरणही समोर येत आहे. भाजप आणि ठाकरे गट काही कालावधीसाठी महापौरपद वाटून घेतील. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटाची जुनी युती पुन्हा जिवंत होईल. याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल.
ठाकरे गटाने घेतलेली ही ‘तटस्थ’ भूमिका भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबाच ठरेल. या बदल्यात ठाकरेंना काय मिळणार, हा प्रश्न अनुत्तरित असला तरी, राजकारणात कायमस्वरूपी कुणीही शत्रू नसतो हेच यातून पुन्हा सिद्ध होत आहे. दावोस दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हालचालींनी मुंबईच्या राजकारणाचे केंद्र आता पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिकेचा हा सत्तासंघर्ष केवळ एका शहरापुरता मर्यादित नसून, तो आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी ठरू शकतो. आता पाहायचे हे आहे की, चाणक्य नीती वापरून भाजप आपला झेंडा फडकवते की एकनाथ शिंदे या चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा नवा मार्ग शोधतात.