
महाराष्ट्रात परत एकदा अतिवृष्टीचा पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यातच चांगला पाऊस झाला होता. कोकण विभागातील जिल्हे, सातारा आणि पुणे या भागातील अनेक ठिकाणी पावसाचं प्रमाण चांगलं होतं.
महाराष्ट्रात लवकरच मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडतोय. पुढील काही काळात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांमध्ये कुठं चांगला पाऊस पडणार याची माहिती दिलीय.
१६ जुलैच्या दुपारनंतर चांगला पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
१७ जुलै रोजी सातारा, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असून नागरिकांना काळजी घेण्याची सूचना दिली आहे. वाऱ्याचा वेग हा ४० ते ५० किमी तास असल्यामुळं काळजी घेण्याची सूचना केली.