Unseasonal Rain: महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, धुळे, वाशिम जिल्ह्यांना अवकाळी पावसाने, गारपिटीने झोडपले. या नैसर्गिक संकटामुळे गहू, कांदा यांसारख्या काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई: कडक उन्हाच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्राला आज निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. भर दुपारी राज्याच्या विविध भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुणे, नाशिक, धुळे आणि वाशिम जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने शहरांत गारवा आणला असला, तरी बळीराजा मात्र पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
26
१. पुण्यात गारांची पांढरी चादर
पुणे शहर आणि भोर तालुक्यात पावसाने रौद्र रूप धारण केले. भोरमधील उत्रौली परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने रस्त्यावर गारांचा खच साचला होता. यामुळे गहू, ज्वारी आणि हरभरा या काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
36
२. नाशिक आणि सिन्नरमध्ये कांदा मातीमोल
नाशिकच्या सिन्नर, नायगाव आणि जायगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह गारांचा वर्षाव झाला. काही मिनिटांतच हिरवी शेते पांढरी पडली. यामुळे शेतात उभा असलेला कांदा गारांच्या माऱ्याने खराब झाला असून, जोमदार वारा सुटल्याने गव्हाचे पीक जमिनीला टेकले आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता प्रशासनाकडे तातडीने पंचनाम्यांची मागणी केली आहे.