
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. यासोबत देशातील युवकांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. तसेच सोनम वांगचूक यांचे उपोषण तातडीने सोडवण्यासाठी सरकारने संवाद साधावा, अशी मागणीही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या देशात आणि महाराष्ट्रात अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत. रस्ते, पायाभूत सुविधा, शिक्षण व्यवस्था आणि प्रशासनातील भ्रष्टाचारामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. विरोधी पक्ष म्हणून या मुद्द्यांवर आवाज उठवणे आवश्यक आहे.
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरही उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलले. उद्धव ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संताप असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाचा उल्लेख करताना ठाकरे म्हणाले की, हा कोणत्याही पक्षाचा विषय नसून देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. वांगचूक यांच्यासारख्या व्यक्तींच्या विचारांचा देशाला उपयोग होणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत उद्धव ठाकरेंनी वांगचूक यांना उपोषण सोडण्याचे आवाहनही केले.
उद्धव ठाकरे यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले. उद्धव ठाकरेंनी म्हटले की, युवकांच्या प्रश्नांवर पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. प्रत्येक राज्यातील प्रमुख शहरांमध्ये युवकांच्या समर्थनार्थ प्रतीकात्मक आंदोलने आणि निदर्शने व्हावीत.
युवकांच्या प्रश्नांवर देशव्यापी पाठिंबा निर्माण करण्यासाठी राहुल गांधींसह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. हा कोणत्याही एका पक्षाचा प्रश्न नसून देशातील युवकांच्या भविष्याशी संबंधित विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी संसदीय अधिवेशनात शिवसेनेचे खासदार हा मुद्दा आक्रमकपणे मांडतील, असे ठाकरे यांनी सांगितले. युवकांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर केंद्र सरकारला उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.