
मुंबई : आषाढी वारीनिमित्त हजारोंच्या संख्येने वारकरी पंढपुराच्या दिशेने दिंडी घेऊन निघाले आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथून एक वाईट बातमी समोर आली आहे. भोंगळे मळा परिसरात दिंडीदरम्यान अपघात झाल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी सध्या स्थानिक पोलीस प्रशासनाकडून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वारकरी दिंडी भोंगळे मळा परिसरातून पुढे जात होते. याच दरम्यान एका भरधाव ट्रकचे नियंत्रण सुटल्याने तो थेट दिंडीत घुसला गेला. यामध्ये तीन महिलांना जोरदार धडक बसली. या तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
या भीषण अपघातात अन्य तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि इतर वारकऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून जखमींवर उपचार सुरू आहेत. तर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला की वाहनात काही तांत्रिक बिघाड होता, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात चालकाची अधिक चौकशी केली जात आहे.
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण वारकरी संप्रदायाकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.