Raj Thackeray-Uddhav Thackeray : 'संकट आलं की एकजूट व्हायचं', उद्धव ठाकरेंच्या विधानाची चर्चा तर राज ठाकरे घेणार पत्रकार परिषद, वाचा घडामोडी

Published : Jun 30, 2025, 09:48 AM IST
Raj Thackeray and Uddhav Thackeray

सार

पहिली ते चौथी इयत्तेसाठी हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा जीआर अखेर राज्य सरकारने मागे घेतला आहे. यावरुन आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून 5 जुलैला विजयी मोर्चा काढला जाणार आहे. तत्पूर्वी उद्धव ठाकरेंच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई : पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी (२९ जून) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली.

सरकारच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंचा निशाणा

हिंदी सक्तीविरोधात झालेल्या दबावामुळे राज्य सरकारने माघार घेतल्याचे सांगत, उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, "पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी माणूस एकत्र आला, आणि याच एकजुटीमुळे सरकारला झुकावं लागलं. हा मराठी माणसाच्या आत्मसन्मानाचा विजय आहे."

उद्धव ठाकरेंचं एक वाक्य आणि चर्चेचा केंद्रबिंदू

उद्धव ठाकरेंनी केलेलं एक विधान विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी म्हटलं, "संकट आलं कीच जागं व्हायचं असं नको, ही एकजूट कायम राहिली पाहिजे." याच वाक्यातून त्यांनी मराठी अस्मितेसाठी दीर्घकालीन युतीची आणि मनसेसह सहकार्याची सूचक घोषणा केल्याचे बोलले जात आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही विविध पक्ष एकत्र आले होते, तो इतिहास पुन्हा घडवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

5 जुलैचा मोर्चा – आता 'विजयी मोर्चा'

उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी होणाऱ्या मोर्च्याला आता ‘विजयी मोर्चा’ असे संबोधले आहे. त्यांनी सांगितले की, आता मोर्च्याचा हेतू सरकारच्या निर्णयाविरोधात नसून मराठी माणसाच्या एकजुटीचा उत्सव असेल. ठाकरे गट आणि मनसेसह इतर सामाजिक संघटनांनाही या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

राज ठाकरे आज घेणार पत्रकार परिषद

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (३० जून) त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ५ जुलैच्या विजयी मोर्चात सहभाग घ्यायचा की नाही, यावर चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे मराठी अस्मितेसाठी ठाकरे-ठाकरे युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याने ही पत्रकार परिषद अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

राज्य सरकारकडून हिंदी सक्तीचा जीआर

राज्य सरकारने नव्या शैक्षणिक धोरणानुसार मराठी व इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये पहिलीपासून पाचवीपर्यंत हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय जाहीर होताच राज्यात टीकेचे वारे सुरू झाले. शिवसेना (ठाकरे गट) व मनसेसह अनेक संघटनांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवला. ५ जुलै रोजी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा झाली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच सरकारने ही माघार घेतल्याचे दिसते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्णयाची घोषणा करत म्हटले की, “त्रिभाषा सूत्र कोणत्या वर्गापासून लागू करायचे, याचा निर्णय आता तज्ज्ञ समिती घेईल. यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. या समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.”

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!
भाविकांसाठी बंपर गिफ्ट! शिर्डी आणि तिरुपतीला जाणाऱ्यांसाठी आता साप्ताहिक स्पेशल रेल्वे; लगेच पाहा संपूर्ण वेळापत्रक!