
Toll Rate Hike : १ एप्रिलपासून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी मोठा बदल लागू झाला आहे. पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर आणि पुणे-नाशिक या प्रमुख महामार्गांवर टोल दरात सरासरी ५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ही दरवाढ लागू केली असून, यासोबतच टोल वसुलीत ‘कॅशलेस’ पद्धत अधिक कडक करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.
पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर नवीन टोल दर लागू झाले आहेत. कार, जीप आणि हलक्या वाहनांसाठी एकेरी प्रवासासाठी आता ९५ रुपये आणि परतीच्या प्रवासासाठी १३० रुपये मोजावे लागणार आहेत. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी हा दर १५० रुपये (एकेरी) आणि २१० रुपये (परतीचा) इतका झाला आहे. बस आणि ट्रकसाठी ३१५ रुपये, तर मोठ्या अवजड वाहनांसाठी ५४५ ते ८१५ रुपयांपर्यंत टोल आकारला जाणार आहे. या वाढीमुळे दररोज प्रवास करणाऱ्यांच्या खर्चात वाढ होणार आहे.
टोल वसुली अधिक पारदर्शक आणि जलद करण्यासाठी आता ‘कॅशलेस’ पद्धतीवर अधिक भर देण्यात आला आहे. टोलनाक्यांवर रोख व्यवहार जवळपास बंद करण्यात आले असून FASTag वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. डिजिटल पेमेंटमुळे वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होणार असली तरी, नियमांचे पालन न केल्यास वाहनचालकांना दंड भरावा लागणार आहे.
जर वाहनावर FASTag नसल्यास किंवा तो वैध नसेल, तर संबंधित टोलच्या दुप्पट रक्कम दंड म्हणून आकारली जाईल. याशिवाय, FASTag ऐवजी UPIद्वारे पेमेंट केल्यास एकूण टोलच्या १.२५ पट रक्कम भरावी लागेल. त्यामुळे प्रवासापूर्वी FASTagमध्ये पुरेसा बॅलन्स आहे का, याची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे.
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच लागू झालेल्या या नियमांमुळे वाहनचालकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. टोल दरवाढ आणि कॅशलेस सक्ती लक्षात घेता, प्रवासाची योग्य योजना आखणे गरजेचे आहे. विशेषतः नियमित प्रवास करणाऱ्यांनी आपल्या खर्चाचा अंदाज घेऊन तयारी ठेवणे आवश्यक आहे.