
ST Bus Fare Hike : जगभरातील भू-राजकीय तणाव, युद्धजन्य परिस्थिती आणि वाढत्या इंधनदरांचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर अधिक तीव्रतेने जाणवू लागला आहे. दूध, सीएनजी, सोने-चांदी यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीचा फटका थेट महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला बसत आहे. वाढत्या डिझेल खर्चामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित कोलमडू लागले असून, येत्या काही दिवसांत बस तिकीटदर वाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, एसटी महामंडळाला दररोज सुमारे 10 लाख 87 हजार लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंडियन ऑईलमार्फत होणाऱ्या डिझेल पुरवठ्याच्या दरात मागील आठवड्यात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे एसटी महामंडळाला दररोज सुमारे 33 लाख 70 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे. वार्षिक स्तरावर हा भार तब्बल 124 कोटी रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एसटी बसभाडेवाढीच्या चर्चांवर बोलताना प्रताप सरनाईक यांनी अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. मात्र, परिस्थिती आणखी गंभीर झाल्यास भाडेवाढ टाळणे कठीण होईल, असे संकेत त्यांनी दिले. “पुढील 10 ते 12 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळाली किंवा ऑईल कंपन्यांनी जुन्या दरात डिझेल पुरवठा केला, तर भाडेवाढ करावी लागणार नाही. अन्यथा दरवाढ अपरिहार्य ठरेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या मध्यपूर्वेसह जगातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावर त्यांनी भर दिला आहे. या परिस्थितीत राज्य सरकार आणि एसटी महामंडळावर आर्थिक ताण वाढत चालल्याचे चित्र आहे.
संभाव्य भाडेवाढीच्या चर्चांदरम्यान प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वाचा दिलासाही दिला. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर लाभार्थी घटकांना दिल्या जाणाऱ्या सवलती कायम राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सामाजिक योजनांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.
यावेळी सरनाईक यांनी अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवरही कठोर भूमिका घेतली. काही पेट्रोल बाईक टॅक्सी नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसोबत गैरप्रकार आणि नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे सायबर पोलिसांना पत्र देण्यात आले असून, फक्त अनधिकृत सेवांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुगलने ओला-उबरसंबंधित काही सेवा बंद केल्याने निर्माण झालेला गोंधळही त्यांनी यावेळी स्पष्ट केला.