
पिंपरी-चिंचवडमधील आणि २०१९ च्या मिस इंडिया अर्थ स्पर्धेत सहभागी झालेली सायली सुर्वे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सायली सुर्वे हिचे धार्मिक विधी करून शुद्धीकरण करण्यात आले असून तिला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या उपस्थितीत होम-हवन, मंत्रोच्चार आणि विविध धार्मिक विधी पार पाडत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
सायली सुर्वेने २०१९ मध्ये मीरा भाईंदर येथील उद्योजक आतिफ तासे यांच्याशी घरच्यांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर सायलीचे नाव बदलून अतेजा तासे असे ठेवण्यात आले होते. मात्र लग्नानंतर आपल्यावर सतत मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप सायलीने केला आहे. तसेच या विवाहानंतर आपले धर्मांतर करण्यात आल्याचाही दावा तिने केला.
सायलीने या संदर्भात अनेक वेळा पोलिसांकडे तक्रार केल्याचे सांगितले. मात्र आपल्या तक्रारींवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप तिने केला आहे. सततच्या छळामुळे आपण मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त झालो होतो. अनेक प्रयत्नांनंतर आपण हिंदुत्ववादी संघटनांच्या संपर्कात आलो आणि त्यांच्या मदतीने शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पडली, असे सायलीने सांगितले.
पिंपरी-चिंचवड परिसरात सायली सुर्वेचे शुद्धीकरण करण्यासाठी विशेष धार्मिक विधी करण्यात आले. यामध्ये होम-हवन, मंत्रोच्चार आणि इतर धार्मिक परंपरांनुसार विधी पार पाडण्यात आले. या प्रक्रियेनंतर तिला पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला.
या वेळी बोलताना सायली सुर्वे म्हणाली की, “मला जातीवाद करायचा नाही, मात्र फरक नक्कीच असतो. आपल्या लोकांनी आपल्या पाठीशी उभे राहणे खूप महत्त्वाचे असते. माझ्यासारख्या परिस्थितीत अडकलेल्या मुलींनी हार मानू नये.” ती पुढे म्हणाली की, “मी जवळपास दहा वर्षे अन्याय सहन केला, कारण माझी चार मुले आहेत. आई म्हणून मुलांचा विचार करून मी इतकी वर्षे संसार टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र एक वेळ अशी आली की माझी सहनशक्ती संपली आणि शेवटी मला हा निर्णय घ्यावा लागला.”
दरम्यान, सायली सुर्वेच्या शुद्धीकरणाच्या या घटनेमुळे धर्मांतर, प्रेमविवाह आणि वैवाहिक वाद या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाकडे सामाजिक आणि राजकीय वर्तुळातूनही लक्ष वेधले जात असून पुढे काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.