
मुंबई: दिवाळीपूर्वी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. दस्त नोंदणी करण्यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे मुंबईकरांची धावपळ थांबणार आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरातील नागरिक, व्यावसायिक आणि कंपनी मालक यांना आधी आपल्या परिसरातच दस्त नोंदणी करता येत होती. पण आता त्याबाबतचा निर्णय बदलवण्यात आला आहे.
मुंबईतील कोणत्याही दस्त नोंदणी कार्यालयात आता नोंदणी करता येणार आहे. यामुळे आता धावपळ बऱ्यापैकी थांबणार आहे. यापूर्वी ज्या भागात रहिवासी किंवा व्यावसायिक होते त्यांना त्या भागातच नोंदणी करता येत होती. मात्र आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ही अट आता रद्द करण्यात येणार आहे.
नव्या निर्णयानुसार आता बरेच बदल होणार आहेत. या नव्या बदलानुसार, बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर, तसेच ओल्ड कस्टम हाऊसजवळील प्रधान मुद्रांक कार्यालय (अंमलबजावणी एक आणि दोन) या सहा कार्यालयांपैकी कोणत्याही ठिकाणी मालमत्ता करार, भाडेकरार, वारसा हक्कपत्र, व अन्य महत्वाची दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
महसूल विभागाच्या या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ आणि धावपळ बऱ्यापैकी थांबणार आहे. दस्त नोंदणी प्रक्रिया बऱ्यापैकी सोयीस्कर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दिवाळीची नागरिकांना भेट देण्यात आली असून भविष्यात नागरिकांचा वेळ वाचणार आहे.