
Nasrapur Bhor Case : पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या घटनेवर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेला “मनाचा थरकाप उडवणारी” असे संबोधले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा गुन्ह्यांमध्ये कायद्याच्या प्रक्रियेचा विचार न करता आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी. सरकार फास्टट्रॅक कारवाईचे आश्वासन देते, पण त्याची ठोस अंमलबजावणी दिसत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे नमूद केले. त्यांच्या मते, समाजात आणि गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही. नसरापूरमध्ये आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर लाठीचार्ज झाल्याच्या घटनांवरही त्यांनी टीका करत, सरकारची प्राधान्यक्रम चुकीचे असल्याचे म्हटले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी व्यापक सामाजिक बदलांवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, सत्तेची लालसा, मोबाईलचा अतिरेकी वापर, ओटीटीवरील कंटेंट आणि बदललेली जीवनशैली यामुळे समाजातील मूल्यव्यवस्था ढासळत आहे. “जे वरती घडतं, त्याचं प्रतिबिंब खाली उमटतं,” असे सांगत त्यांनी समाजातील नैतिक अधःपतनावर चिंता व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी केवळ आरोपीला शिक्षा देऊन प्रश्न सुटणार नाही, तर अशा घटना का घडतात याचा मूलभूत विचार होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. समाज, सरकार आणि माध्यमांनी एकत्र येऊन ठोस पावले उचलली पाहिजेत, अन्यथा अशा घटना पुन्हा घडत राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.