
Operation Tiger : उबाठा पक्षाने आज दिल्लीत बोलावलेल्या संसदीय दलाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यासाठी सर्व खासदारांना व्हिप बजावण्यात आला होता. तरीही लोकसभेतील नऊपैकी फक्त तीन खासदार उपस्थित राहिले. अशातच सहा खासदारांच्या अनुपस्थितीमुळे एकनाथ शिंदे यांच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
दिल्लीत झालेल्या बैठकीला लोकसभा खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते. राज्यसभेतील खासदार संजय राऊतही बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित खासदारांशी चर्चा करत पुढील राजकीय रणनीतीवर विचार केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील हे सहा खासदार बैठकीसाठी अनुपस्थित राहिले. या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची चर्चा रंगली होती. याशिवाय स्वतंत्र गट स्थापन करण्यासंदर्भातील एक पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केल्याचे बोलले जात होते. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, व्हीपचे उल्लंघन केल्याचा मुद्दा उपस्थित करत उबाठा गटाकडून लोकसभा अध्यक्षांना पुन्हा पत्र देण्याची तयारी सुरू आहे. अनुपस्थित राहिलेल्या खासदारांविरोधात कारवाईची मागणी करण्याचाही पर्याय पक्षाकडून केला जात असल्याचे सांगितले जातेय.