
मुंबई - राज्य विधिमंडळाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांबद्दल कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून विरोधक सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले हे सरकारविरोधात घोषणा देत होते.
नाना पटोले यांनी दोन नेत्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिशेने गेले आणि हातवारे केले. अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. या सगळ्या राड्यानंतर पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित केलं. ते नाना पटोले यांच्यावर भडकल्याचं दिसून आलं.
"विधानसभा अध्यक्षांनाच दोषी धरून त्यांच्या अंगावर धावून जाणं चुकीचं आहे. नानाभाऊ हे स्वत: अध्यक्षपदावर राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी अध्यक्षांची माफी मागायला हवी," असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. अध्यक्षांनी माझं रोज निलंबन केलं तरी मी शेतकऱ्यांचा मुद्दा सोडणार नाही.
नाना पटोले यांचे निलंबन केल्यामुळं सर्व विरोधकांनी मिळून आजच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. आमदार लोणीकर यांनी शेतकऱ्यांवर खालच्या भाषेत निशाणा साधला होता. "तुमच्या अंगावरचे कपडे आणि पायातील चप्पल सुद्धा सरकारमुळेच आहे. मोदींनी तुमच्या वडिलांना पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले, असं आमदार म्हटले होते.
"सोशल मीडियावर बसलेले चार-पाच कार्टी असतात, त्यांच्या आईचा पगार बबनराव लोणीकरने केला, त्यांच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरने केलं. नरेंद्र मोदींनी सहा हजार रुपये तुमच्या बापाला पेरणीला दिले. तुमच्या आईच्या, बहिणीच्या, बायकोच्या नावावर लाडक्या बहीण योजनेतून पैसे दिले. तुमच्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे आणि तुमच्या पायातली चप्पल आमच्यामुळेच, हातातलं ते मोबाईलचं डबडं आमच्यामुळेच आहे. आमचंच घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो," अशा अतिशय अश्लाघ्य भाषेत लोणीकर यांनी शेतकऱ्यांना टार्गेट केलं होत.