
मुंबई : नागपूर जिल्ह्यातील बाजारगावजवळ असलेल्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल १७ कामगार जखमी झाले आहेत. त्यापैकी ४ जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटाच्या अगोदर प्लांटमधून धूर निघताना दिसला होता. त्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांनी धोका ओळखून कामगारांना बाहेर जाण्याचे सुचवले. अनेक कामगारांनी बाहेर धाव घेतली, पण मयूर गणवीर हे वेळेत बाहेर पडू शकले नाहीत आणि स्फोटाच्या तडाख्यात सापडले. या स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की प्लांटचे काँक्रीट व लोखंडी तुकडे शेकडो मीटर लांबपर्यंत उडून गेले.
बचावकार्य आणि जखमींची मदत
स्फोटानंतर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल व प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी धावून आले. सुरुवातीला पुन्हा स्फोट होऊ नये यासाठी थोडा वेळ सावधगिरी बाळगण्यात आला. त्यानंतर कूलिंग ऑपरेशन करून मलब्याखाली दबलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले.सर्व जखमींना तत्काळ नागपूरमधील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.
काँक्रीटचे तुकडे महामार्गावर कोसळले
स्फोटाची तीव्रता किती मोठी होती हे कंपनीसमोरील नागपूर–अमरावती राष्ट्रीय महामार्गावर स्पष्ट दिसून आले. काँक्रीटचे मोठमोठे तुकडे आणि पिल्लर संरक्षण भिंतीला ओलांडून ४००–५०० मीटर अंतरावर महामार्गावर आणि शेतात कोसळले. ही तुकडी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर पडली नसल्याने मोठा अनर्थ टळला.
१० कामगार गंभीर जखमी
या स्फोटात अनेक कामगार गंभीर जखमी झाले असून कैलास वर्मा, मनीष वर्मा, सनी कुमार, अरुण कुमार, अतुल मडावी, सौरभ डोंगरे, तेजस बांधते, सुरज गुटके, अखिल बावणे आणि धर्मपाल मनोहर ही जखमींची नावे समोर आली आहेत. स्फोटापूर्वी प्लांटमध्ये धूर दिसल्याने कामगारांना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला आणि त्यामुळे अधिक मोठी जीवितहानी टळली.
पूर्वीही घडली होती भीषण दुर्घटना
या कंपनीत यापूर्वीही भीषण स्फोट झाला होता. १७ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता.त्यामुळे पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेने सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
लोखंडी मशीनचे तुकडेही शेतात फेकले गेले
स्फोटाची ताकद इतकी प्रचंड होती की प्लांटमधील लोखंडी मशीनचे जड तुकडे ४०० ते ५०० मीटर अंतरावर महामार्गाच्या पलीकडील शेतांमध्ये जाऊन कोसळले. काही तुकडे इतके वजनदार होते की एका व्यक्तीला ते हलवणे शक्य नव्हते. त्यामुळे या स्फोटाची भीषणता किती प्रचंड होती, याचा अंदाज यातून येतो.