
धाराशीव : धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर शिवसेना उबाठा हा पक्ष सोडल्याचं जाहीर केलं आहे. तसेच आजपासून आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं जाहीर केलं. ओमराजे निंबाळकर यांनी ही घोषणा धाराशीवला जाऊन त्यांच्या गावी केली, यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना मातोश्रीबद्दल एक नियम बनवला आहे, आणि तो पाळा असं सांगितलं. ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी शिवसेना उबाठा सोडण्यापेक्षा आपल्या वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणात 20 वर्ष उलटून गेली तरी आपल्याला न्याय मिळत नाहीय, ही खंत व्यक्त केली. याबाबतीत न्याय मिळवण्यासाठी आपण सतत संघर्ष करत राहू, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
साधा ट्रान्सफॉर्मर मिळत नव्हता
ओमराजे निंबाळकर यांनी मीडियाशी दिवसभरात बोलताना शिवसेना- उबाठासोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेकडे जाण्याचं कारण, साधा ट्रान्सफॉर्मर देखील मिळत नाही, अशी खंत बोलून दाखवली. विकास निधी तर काय, पण साधा ट्रान्सफॉर्मर शेतात जळाला आणि शेतीला वीज नसेल, तर शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर मिळत नव्हता असं कारण देखील सांगितलं.
बोलण्यात शिंदेंकडे जाण्याचा कल दिसून आला
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपण सर्व जवळच्या कार्यकर्त्यांना व्यक्तींना आज येथे उपस्थित राहण्याविषयी मेसेज पाठवले होते. आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित आहात, म्हणून त्यांनी सर्वांचे आभार मानले. ओमराजे निंबाळकर हे बंद दाराआड चर्चा करुन बाहेर आले. पण धाराशीवमध्ये पत्रकारांशी बोलतानाच, अप्रत्यक्ष बोलून गेले होते, ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच जाणार आहेत. आपल्याला शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर, गावागावात विकास करताना अडचणी येत असल्याचं त्यांनी कारण सांगितलं.
मातोश्रीबद्दल अजिबात वाईट बोलू नका
मातोश्रीबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना जाहीर ताकीद दिली आहे. ठाकरे घराण्याचे निश्चितच आपल्यावर उपकार आहेत. तेव्हा सोशल मीडियावर आपल्यावर कुणी कितीही टीका केली, तरी देखील मातोश्रीबद्दल काहीही वाईट अजिबात बोलू नका, संयमाने आणि आदरानेच बोला, माझी ही सर्व कार्यकर्त्यांना जवळच्या व्यक्तींना सर्वांनाच विनंती असेल, असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.