
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा दिंडी सोहळा पुणे शहरातून पंढरपूरकडे दरवर्षी जात असतात. यावर्षी पुण्यातून जात असताना गुन्हेगारी टोळ्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचं दिसून आलं आहे. या दिंडी सोहळ्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर चोरी झाल्याचं दिसून आलं आहे. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ५ आणि ६ च्या पथकाने जेरबंद केले आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या कारवाईत ६ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या आरोपींकडून २२.५ तोळे वजनाची २० सोन्याची मंगळसूत्रे/गंठण आणि १४ मोबाईल हँडसेट असा एकूण २३,९१,१३० रुपयांचा दस्तऐवज जप्त करण्यात आला आहे.
यावेळी ६ आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्या आरोपींची नावे चांदणी शक्ती कांबळे (३२, लातूर), रिटा ऊर्फ गंगा नामदेव कांबळे (३५, लातूर), बबीता सुरज उपाध्ये (५७, लातूर), पुजा धिरज कांबळे (३५, लातूर), गणेश विलास जाधव (३०, सोलापूर), अरबाज नौशाद शेख (१९, झारखंड) यावेळी एका बालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
हडपसर पोलीस ठाणे: गुन्हा रजिस्टर नं. ५९५, ५९६, ५९७, ५९८/२०२५ (IPC कलम ३०३(२), ३०४(२)) लोणी काळभोर पोलीस ठाणे: गुन्हा नं. २८५/२०२५ (IPC कलम ३०३(२)) वानवडी पोलीस ठाणे: गुन्हा नं. २७४/२०२५ (IPC कलम ३०३(२))
पोलिसांनी चोरीचा पटकन तपास लावला आहे, वारकऱ्यांचे चोरी गेलेले मोबाईल आणि दागिने मिळवून दिले आहेत. ज्या वारकऱ्यांचे आणि भाविकांचे मोबाईल आणि दागिने चोरी गेले आहेत, त्यांनी हडपसर आणि वानवडी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असं सांगण्यात आलं आहे. वारकऱ्यांकडून पोलिसांनी लावलेल्या तपासाचे कौतुक करण्यात आलं आहे.
वारकरी संप्रदायाची वारी ही भक्ती, श्रद्धा आणि निष्ठेचा महापर्व आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या पवित्र यात्रेच्या वेळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लाखोंच्या संख्येने जमा होणाऱ्या भाविकांच्या गर्दीत चोरटे आपली संधी साधतात. गर्दीचा फायदा घेत पिशव्या, मोबाईल, दागिने, पैशाचे पाकीट अशी मौल्यवान वस्तू चोरल्या जातात.
पूर्वीच्या वारीमध्ये पुणे, सोलापूर, पंढरपूर अशा प्रमुख मार्गांवर चोरीच्या अनेक तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या. काही घटनांमध्ये वारकऱ्यांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्याही खेचून नेल्या गेल्या. यामुळे वारकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं. पोलिसांनी काही ठिकाणी गुप्तचौकशी करून टोळ्या पकडल्याही होत्या, पण अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहिल्या.
पोलीस प्रशासन दरवर्षी वारी दरम्यान अतिरिक्त बंदोबस्त ठेवत असले तरीही काही टोळ्या हुशारीने चोरी करत अस्तरात. त्यामुळे वारकऱ्यांनी स्वतःची काळजी घेणे, मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे, आणि संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. यामुळे अशा घटनांना आळा बसू शकतो आणि वारी अधिक सुरक्षित होऊ शकते.