
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या कार्यकर्त्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. आठ जिल्ह्यांतील 34 कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येणार असून, एकूण 3 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी राज्यात झालेल्या विविध आंदोलनांमध्ये एकूण 309 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी राज्य सरकारने 27 कोटी 50 लाख रुपयांची मदत मंजूर केली होती. मात्र त्यापैकी 34 कुटुंबांना अद्याप मदत मिळाली नव्हती, ती आता तातडीने मंजूर करण्यात आली आहे.
या निर्णयानुसार बीड जिल्ह्यातील 15, धाराशिव 5, परभणी 4, हिंगोली 4, नांदेड 3, जालना 1, छत्रपती संभाजीनगर 1 आणि लातूर 1 अशा एकूण 34 वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये मिळणार आहेत. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
आंदोलनादरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता टप्प्याटप्प्याने केली जात असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, त्यावर वेगाने कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते की, सरकारने दिलेली सर्व आश्वासने सार्वजनिकपणे जाहीर केली असून त्यानुसारच निर्णय घेतले जात आहेत. मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारने सातत्याने घेतली असल्याचेही त्यांनी नमूद केले.