
Vidhan Parishad Election 2026 : कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचा या निवडणुकीत कोणताही विरोधी उमेदवार न राहिल्याने त्यांचा थेट विजय झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरली असून कोकणातील राजकीय समीकरणात मोठा बदल पाहायला मिळाला आहे.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सुरुवातीला चुरशीची लढत अपेक्षित होती. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला.
विजयानंतर अनिकेत तटकरे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. “तारखांचा योगायोग आणि नियतीचा खेळ” असे म्हणत त्यांनी 2018 पासून 2026 पर्यंतच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
दोन तारखा...दोन प्रवास...आणि विलक्षण योगायोग!
कधी कधी नियती आपल्या आयुष्यात अशी काही किमया करत असते की अगदी आश्चर्यचकित करुन टाकते.
दि. २४ मे २०१८ - माझ्या आयुष्यातला तो अविस्मरणीय दिवस जेव्हा मला प्रथमच आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी लाभली.
अगदी वर्षभरानंतरच...
दि.… pic.twitter.com/goaV3dFaVl— Aniket Tatkare (@ATatkare) June 5, 2026
या निवडणुकीत पाच मतदारसंघांमध्ये निवडणूक बिनविरोध झाली असून महायुतीच्या उमेदवारांनी थेट विजय मिळवला आहे. यात वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर, पुणे, ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि यवतमाळ या मतदारसंघांचा समावेश आहे.
काही ठिकाणी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे तर काही ठिकाणी सहमती झाल्यामुळे महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.