
Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानाचे दोन टोकाचे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे विदर्भातील अनेक जिल्हे प्रखर उष्णतेच्या लाटेमुळे अक्षरशः होरपळून निघत आहेत, तर दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी उष्णतेबाबत गंभीर इशारा दिला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काल रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आता पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. विदर्भातील अनेक भागांत उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. विशेषतः गोंदियामध्ये तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
भंडारा जिल्ह्यात तब्बल 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, हा यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे. प्रखर उन्हामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर लस्सी, लिंबू सरबत, ताक आणि इतर शीतपेयांकडे वळताना दिसत आहेत. आरोग्य विभागानेही नागरिकांना पुरेसे पाणी पिण्याचा आणि उन्हात बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून नागरिक उष्णतेमुळे त्रस्त झाले आहेत. हवामान विभागाने पुढील तीन ते पाच दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या मजुरांनी विशेष काळजी घ्यावी, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
एकीकडे विदर्भ उष्णतेने भाजून निघत असताना दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच अहिल्यानगर, सांगली, ठाणे, रायगड, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या सरी कोसळू शकतात. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी प्रशासनाचा इशारा
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत थेट उन्हात जाणे टाळावे, पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे, हलके आणि सैल कपडे वापरावेत तसेच उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.