
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 साठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. नऊ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, भारतीय जनता पक्षाने तब्बल 30 इच्छुकांची यादी दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवली असून, या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे.
भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या नऊ सदस्यांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे. याशिवाय, डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक देखील होणार आहे. अधिसूचना 23 एप्रिल रोजी जारी करण्यात आली असून, 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 2 मे रोजी छाननी होणार असून, 4 मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल.
भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. संघटनात्मक काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार आणि अमित साटम यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही रणनीती ठरवण्यात आली.
भाजपने पाठवलेल्या यादीत अनेक दिग्गज आणि नवोदितांची नावे आहेत. त्यामध्ये माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे आणि संदीप जोशी यांचा समावेश आहे. या नावांवर अंतिम निर्णय दिल्लीतील नेतृत्व घेणार आहे.
पोटनिवडणुकीसाठी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ही संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कार्यकाळाची मुदत मूळतः 2030 पर्यंत होती, मात्र राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे.
विधान परिषदेत संजय केणेकर, नीलम गोऱ्हे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे यांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.