
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने झोडपलेल्या महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे काही भागांत तापमानात वाढ झाल्याचे दिसून आहे. पण हवामान खात्याने पावसाबद्दलचा ताजा अंदाज जाहीर केला आहे. हवामान खात्यानुसार, राज्यात पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बसरण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी IMD कडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर परिसरासाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा भागासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही हलक्या सरी पडू शकतात.
विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, वाशीम आणि नागपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे. यामुळे या भागांत तुलनेने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.