Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; घाटमाथ्यांना ऑरेंज अलर्ट, अनेक जिल्ह्यांत मुसळधार सरी

Published : Aug 06, 2026, 08:35 AM IST
Maharashtra Rain

सार

राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून घाटमाथ्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील धरणसाठ्यातही वाढ झाली आहे. 

मुंबई : राज्यात पावसाचा जोर कायम असून अनेक जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार सरी कोसळत आहेत. सातारा, पुणे आणि रायगडच्या घाटमाथ्यासह रत्नागिरी, ठाणे, नाशिक आणि कोल्हापूरच्या डोंगराळ भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे येथे हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे, मुंबईतील धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे.

घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा इशारा

राजस्थानमधील श्रीगंगानगर ते ईशान्य भारतातील मिझोरामपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याशिवाय कर्नाटकमध्ये सुमारे 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. या हवामानाच्या स्थितीमुळे महाराष्ट्रातील घाटमाथा आणि कोकण पट्ट्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईत संततधार

मुंबईत रात्रभर जमदार पाऊस झाला. आज सकाळीही अनेक भागांत पाऊस सुरू आहे. तर गेल्या काही दिवसांतील पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या 88.93 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात पिण्याच्या पाण्याबाबत मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक पाऊस

राज्यातील अनेक भागांत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप पिकांना मोठा फायदा होत आहे. पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक धरणांच्या पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

भंडाऱ्यात ग्रीन अलर्ट

भंडारा जिल्ह्याला ग्रीन अलर्ट असतानाही शहरासह ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर वाढलेला आहे. भांसा, लाखनी, साकोली, तुमसर आणि मोहाडी तालुक्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नंदुरबारमध्ये पिण्याच्या पाण्याची चिंता कायम

नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 250 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना जीवनदान मिळाल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेला सलग आणि दमदार पाऊस अद्याप झालेला नाही.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video: पुण्यात भर पावसात तुटकी छत्री घेऊन ड्युटी, तरुणाने पोलिसाला अशी मदत केली की मनं जिंकली!
नितीन गडकरींना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा; AI डीपफेक आणि आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याचे आदेश