
Maharashtra Monsoon Update : राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत पावसाचा जोर दिसून आला होता. त्यानंतर काहीसा खंड पडला असला, तरी आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकण, घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा
कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, रायगड आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याशिवाय, संपूर्ण आठवडा आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
मान्सूनने व्यापला महाराष्ट्र
१६ जून रोजी मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, हे वारे गुजरात व मध्य प्रदेशच्या भागांमध्येही पोहोचले आहेत आणि उत्तरेकडे वाटचाल करत आहेत.
हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागराच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. त्यामुळे ढगांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असून, या हवामान बदलाचा थेट परिणाम मोसमी पावसाच्या तीव्रतेवर होणार आहे. राज्यावर हवेचा दाब कमी राहिल्यास, सोमवारपासून राज्यभर चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होईल. ज्या भागांत आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे, त्या भागांतही पावसाचा जोर वाढेल असा अंदाज आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या ठिकाणी अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसणार आहेत. अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूरमध्ये वीजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.
राज्यामध्ये मान्सूनची स्थिती: