
Maharashtra Weather : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता उष्णतेचा पारा झपाट्याने वाढू लागला आहे. हवामान विभागाने काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून नागरिकांना पुढील 72 तास अनावश्यक बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण विभागात आज हवामान कोरडे राहणार असले तरी समुद्रकिनारी भागात दमट वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवणार आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान २४ ते २६ अंश, तर कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेचा त्रास अधिक जाणवू शकतो.
पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह सोलापूर या भागांमध्ये तापमानात मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. सकाळी गारवा असला तरी दुपारनंतर तापमान ३६ ते ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मुंबईमध्ये आज तापमान सुमारे २८ अंश नोंदवले गेले असून कमाल तापमान ३० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सूर्योदय सकाळी ६:२२ वाजता, तर सूर्यास्त संध्याकाळी ६:५४ वाजता होईल. आर्द्रतेचे प्रमाण ५७% असल्याने दमट उकाडा जाणवणार आहे.
पुढील सात दिवसांत मुंबईतील कमाल तापमान ३० ते ३३ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेचा प्रभाव कायम राहणार असून नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.
मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १५४ नोंदवला गेला असून तो ‘Poor’ श्रेणीत येतो. PM 2.5 आणि PM 10 चे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्यासच बाहेर पडावे आणि मास्कचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.