
Mumbai Water Cut : दक्षिण मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेने मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामासाठी १८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १६ आणि १७ एप्रिल रोजी अनेक भागांतील नागरिकांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागणार आहे.
या पाणी कपातीचा परिणाम A, B, C, E आणि F-South विभागांतील अनेक भागांवर होणार आहे. परळ, लालबाग, दादर, भायखळा आणि कुलाबा या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा बंद असल्याने अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
बीएमसीच्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून १७ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत, म्हणजेच सुमारे १८ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात जलवाहिनी दुरुस्ती, झडप बदलणे आणि तांत्रिक तपासणीची कामे केली जाणार आहेत.
मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांना आधीच पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाण्याचा जपून वापर करावा आणि अनावश्यक पाणी वाया जाऊ नये याची काळजी घेण्याचेही सांगितले आहे.
मुख्य जलवाहिनीच्या नियमित दुरुस्ती आणि देखभाल कामासाठी ही पाणी कपात आवश्यक असल्याचे बीएमसीने स्पष्ट केले आहे. या कामांमुळे भविष्यात पाणीपुरवठा अधिक सुरळीत आणि विश्वासार्ह होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.