
Samruddhi Mahamarg Accident : वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आहे. या अपघातात आई-वडील गंभीर जखमी झाले असताना त्यांचे अवघे दीड वर्षांचे बाळ चमत्कारिकरित्या सुखरूप बचावले. “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. याबद्दलची माहिती न्यूज18 मराठी यांनी दिली आहे.
समृद्धी महामार्गाच्या नागपूर लेनवर दोनद ते खरडगाव दरम्यान भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या अपघातात कार चालक श्याम देशमुख (वय ४२) आणि त्यांची पत्नी जयश्री देशमुख (वय ३८) गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
देशमुख कुटुंब मुंबईहून अमरावतीकडे प्रवास करत असताना हा अपघात झाला. विशेष म्हणजे अमरावती शहर अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर असताना हा अपघात घडला.
श्याम देशमुख यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अमरावतीतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी जयश्री देशमुख यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. मात्र या भीषण अपघातात त्यांचा दीड वर्षांचा मुलगा पूर्णपणे सुरक्षित राहिल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.