Onion Purchase From Farmers : शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदीची राज्याची केंद्राकडे जोरदार मागणी, दिलासा मिळणार का?

Published : Jul 07, 2025, 10:58 PM ISTUpdated : Jul 07, 2025, 11:00 PM IST
Onion Purchase From Farmers

सार

पावसामुळे कांदा उत्पादकांना झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची मागणी केली आहे. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली

नवी दिल्ली : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थेट मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची मागणी अधिकृतपणे मांडली.

महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर आणि सांगली हे जिल्हे देशातील सुमारे ५५% कांदा उत्पादन करतात. मात्र, मे २०२५ मध्ये झालेल्या अनियमित पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणं कठीण झालं आहे.

 

 

मागणीची ठळक वैशिष्ट्ये

नाफेड व एनसीसीएफ यांच्यामार्फत थेट शेतकऱ्यांकडून लिलाव पद्धतीने कांदा खरेदी करण्यात यावा.

५ लाख मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात यावा.

पैसे थेट DBT प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत.

प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यासाठी स्वतंत्र लेखापरीक्षक पथकाची नियुक्ती करावी.

किरकोळ बाजारात दर ४०-४५ रुपये किलोवर गेल्यासच निर्यात शुल्क लावण्यात यावे, जेणेकरून आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा कांदा स्पर्धात्मक दरात पोहोचेल.

या मागण्या मान्य झाल्यास, शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही वाजवी दरात कांदा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

आधुनिक तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्ससाठी पावलं

राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे 'राष्ट्रीय काढणीपश्चात तंत्रज्ञान संस्था' (National Institute of Post-Harvest Technology) स्थापन केली आहे. ही संस्था नेदरलँड्सच्या सहकार्याने उभारण्यात आली असून, हरितगृह आधारित तंत्रज्ञान प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांना उत्पादनांचे मूल्यवर्धन, साठवणूक आणि बाजार स्थैर्य साधण्यास मदत करणार आहे. या संस्थेला नोडल एजन्सीचा दर्जा देण्याची मागणीही मंत्री रावल आणि कोकाटे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली आहे.

कृषी लॉजिस्टिक्स हबचे उद्घाटन लवकरच

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे, बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत कृषी लॉजिस्टिक्स हब विकसित करण्यात आला आहे. या हबच्या उद्घाटनासाठी केंद्रीय कृषीमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले असून, कृषी क्षेत्रात पुढाकार घेणाऱ्या महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीचा हा टप्पा ठरणार आहे.

केंद्र सरकारने ही मागणी मान्य केल्यास, फक्त शेतकऱ्यांनाच नव्हे तर ग्राहकांनाही याचा मोठा फायदा होईल. मध्यस्थांची साखळी कमी करून थेट शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी करणे, हे या निर्णयामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

नववर्षात कोकण-गोवा ट्रिप प्लॅन केलीय? रेल्वेची मोठी घोषणा, या मार्गांवर धावणार खास गाड्या वेळापत्रक जाणून घ्या
तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!