
Maharashtra Board Exam : राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षांच्या गोपनीयतेसंदर्भात वारंवार उपस्थित होणाऱ्या प्रश्नांनंतर आता राज्य मंडळाने परीक्षा प्रक्रियेत मोठे डिजिटल परिवर्तन करण्याची तयारी सुरू केली आहे. पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रश्नपत्रिका थेट डिजिटल स्वरूपात परीक्षा केंद्रावर पाठवण्याचा आणि उत्तरपत्रिकांचे ऑनस्क्रीन मूल्यांकन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग जून-जुलैमधील पुरवणी परीक्षेत राबवला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास भविष्यात राज्यभर ही प्रणाली लागू करण्याचा बोर्डाचा मानस आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सध्या पारंपरिक पद्धतीने प्रश्नपत्रिका वितरण आणि उत्तरपत्रिका तपासणी करत असले तरी बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या फेब्रुवारी-मार्च परीक्षेदरम्यान बारामती येथे डिजिटल ट्रंकेच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. त्या प्रयोगानंतर आता थेट डिजिटल स्वरूपात प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहोचवण्याची नवी यंत्रणा विकसित करण्यात येत आहे.
या प्रक्रियेमुळे प्रश्नपत्रिका वाहतूक, सुरक्षा आणि गोपनीयतेशी संबंधित धोके कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बोर्डाच्या मते, डिजिटल प्रणालीमुळे पेपरफुटीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल आणि परीक्षा प्रक्रियेला अधिक पारदर्शकता प्राप्त होईल.
पुरवणी परीक्षेत प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपात थेट परीक्षा केंद्रावर पाठवण्यात येणार आहेत. केंद्रप्रमुखांना पासवर्ड-आधारित सुरक्षित प्रणालीद्वारे प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्याची परवानगी दिली जाईल. त्यानंतर संबंधित प्रश्नपत्रिकेची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना वितरित केली जाईल.
ही प्रक्रिया अखंडित आणि सुरक्षित राहावी यासाठी प्रत्येक केंद्रावर इंटरनेट सुविधा, अखंड वीजपुरवठा, जनरेटर आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुरुवातीला हा प्रयोग केवळ एका केंद्रापुरता मर्यादित ठेवण्यात येणार असून, त्यातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल.
राज्य मंडळाने उत्तरपत्रिकांच्या तपासणी प्रक्रियेतही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका स्कॅन करून त्यांचे ऑनस्क्रीन मूल्यांकन केले जाणार आहे. या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाची मदत घेण्याचाही विचार सुरू आहे.
सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ऑनस्क्रीन मूल्यांकन प्रणाली यशस्वीपणे राबवली जात आहे. त्याच धर्तीवर राज्य मंडळही अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक मूल्यमापन प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे निकाल प्रक्रिया अधिक जलद होण्याची शक्यता आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये काही विषयांसाठी अत्यल्प विद्यार्थी संख्या असते. अशा विषयांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका, परीक्षा केंद्र व्यवस्था आणि तपासणी प्रक्रिया उभी करावी लागते. त्यामुळे वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो.या पार्श्वभूमीवर, कमी प्रतिसाद असलेल्या विषयांचा आढावा घेऊन काही अनावश्यक विषय कमी करण्याचाही विचार बोर्डाकडून सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे परीक्षा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि खर्चिकदृष्ट्या नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
राज्य मंडळाच्या या निर्णयाकडे शिक्षण व्यवस्थेतील मोठ्या डिजिटल बदलाच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणून पाहिले जात आहे. पेपरफुटी, निकालातील विलंब आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर आता भर दिला जात आहे. आगामी काळात संपूर्ण परीक्षा प्रणाली अधिक आधुनिक, सुरक्षित आणि डिजिटल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.