
मुंबई : लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेतून ८० लाख महिलांना वगळण्यात आल्याचं समोर आलं होतं. मात्र आता नव्या माहितीनुसार ८० लाखांचा आकडाही मागे पडला आहे. ८० लाख नाही तर तब्बल ९२ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलं आहे, अशी चर्चा आहे. योजनेसाठी दिलेली वयाची मर्यादा न पाळणं, ई-केव्हायसी न करणं आणि योजनेत दिलेले आर्थिक निषक न पाळणं, अशा सर्व निकषांमध्ये न बसलेल्या कारणांमुळे लाडकी बहीण योजनेतून महिलांना वगळण्यात आलं आहे, अनेक महिलांनी ई-केव्हायसी केलंच नाही अशी माहितीही अदिती तटकरेंनी दिली आहे.
काय म्हणाल्या अदिती तटकरे?
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या, 'ज्यावेळी ई-केव्हायसीची प्रक्रिया सुरू केली. त्या ई-केव्हायसीच्या प्रक्रियेमध्ये सहा महिन्यांची मुदत दिली होती. पहिल्या कालावधीमध्ये एक महिन्याची मुदत, नंतर दोन महिने, त्यानंतर आणखी दोन महिने अशी ३१ डिसेंबरपर्यंत ई-केव्हायसीची मुदत देण्यात आली होती. यानंतरही ३१ डिसेंबरपर्यंत ज्यांनी ई-केव्हायसी केलं, पण त्यांच्या ई-केव्हायसीमध्ये काही त्रुटी राहिल्या आहेत, त्यांना या त्रुटी दुरुस्त करण्याची मुदत एप्रिलपर्यंत संधी दिली. ई-केव्हायसीची प्रोसेस पूर्ण न केलेल्या महिलांची संख्याच ६० लाखांहून अधिक आहे. या योजनेअंतर्गत महिलांनी कधीच ई-केव्हायसी केलं नाही.'
अनेक महिला निकषांच्या बाहेर, त्यांची नावं योजनेतून बाहेर - अदिती तटकरे
'शिवाय इन्कम टॅक्सचा डेटा पाच लाख, त्यानंतर ई-केव्हायसी केल्यानंतर ९ ते १० लाखांचा डेटा समोर आला. या डेटामध्ये त्यांचं आर्थिक उत्पन्न, त्याच्या घरातील पतीचं, वडिलांचं आर्थिक उत्पन्न ई-व्हायसीमध्ये आढळून आलं. अशी महिलांची संख्या जवळपास १४ ते १५ लाखांची आहे. ज्यांच्याकडे वाहनं होती, त्यांचाही डेटा समोर आला आहे. आपल्या नावावर वाहनं आहेत, अशी जवळपास ४ ते ५ लाख महिलांची संख्या आहे, अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे', अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.