
जळगाव : जळगाव जिल्ह्यात पोलीस भरतीची तयार करणारे उमेदवार आक्रमक झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ताफ्याला तरुणांनी गराडा घातला. गुलाबराव पाटील पोलीस मुख्यालयातील पद्मालय सभागृहात एका कार्यक्रमासाठी येत होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्याला अडवत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना घेराव घालत रस्त्यातच ठिय्या आंदोलन केलं. पोलीस मुख्यालयाचे मैदान स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. या घटनेने भररस्त्यात एकच खळबळ उडाली होती.
काय आहे विद्यार्थ्यांनी मागणी?
रस्त्यात ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांबाबत बोलताना सांगितलं, की आम्हाला धावण्यासाठी कोणतंही ग्राऊंड उपलब्ध नाही. पोलीस आम्हाला पोलीस ग्राऊंडला पळू देत नाही, तसंच रस्त्यावरही पळू देत नाही. आमची गिरीश महाजनांकडे एकच मागणी आहे, की आम्हाला पोलीस ग्राऊंड सुरू करुन द्या. शिवाय छत्रपती क्रिडा संकुल हेदेखील सुरू करून द्या. आम्ही सर्व जळगावचे स्पर्धा-परीक्षा, सैन्य भरती, पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहोत. आम्ही आमच्या या मागणीसाठी इथे मोर्चा घेऊन आलो आहोत, आमची सरकारने मागणी मान्य करावी, गोरगरिबांच्या मुलांना न्याय द्यावा, अशा शब्दांत त्यांनी आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मैदान सुरू करण्याची विनंती केली आहे.
पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी, मुलांना-विद्यार्थ्यांना धावण्यासाठी, स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मैदान उपलब्ध करुन द्या, आमच्याकडे दुर्लक्ष करू नका, आमची मागणी मान्य करा, अशी मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
मंत्री गुलाबराव पाटील स्पर्धा-परीक्षा देणाऱ्या मुलांच्या मागणीवर काय म्हणाले?
यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं, की आम्ही नुकतीच यावर चर्चा केली. पुढील दोन दिवसांत मैदानातील किरकोळ काम संपल्यानंतर मुलांना मैदान मोकळं करुन दिलं जाईल. मंत्री म्हणून आमची ही जबाबदारी आहे, त्यामुळे सोमवारी हे मैदान मुलांसाठी उपलब्ध केलं जाणार आहे, असं ते म्हणाले.