
Jalgaon Hit and Run Case : पुण्यातील कल्याणीनगर पोर्श कार अपघाताची आठवण ताजी करत जळगावमध्ये पुन्हा एकदा भीषण हिट अँड रनची घटना घडली आहे. शहरातील रामानंदनगर परिसरात रात्रीच्या सुमारास एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत तब्बल ९ जणांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन दाम्पत्यांसह एका तरुणाला गंभीर दुखापत झाली असून एकूण ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, गिरणा टाकी ते चर्च परिसरात हा अपघात घडला. अल्पवयीन मुलगा कार घेऊन रस्त्यावर आला असता त्याचा वेग इतका प्रचंड होता की अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. काही क्षणांतच कारने रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी आणि दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की अनेक जण हवेत उडून रस्त्यावर कोसळले.
अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली तर परिसरात किंचाळ्यांचे आवाज घुमले. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून आणि भीतीपोटी की आपल्याला मारहाण होऊ शकते, या भीतीने अल्पवयीन चालक घटनास्थळीच कार सोडून अंधाराचा फायदा घेत फरार झाला.
या अपघातात दोन दांपत्ये (पती-पत्नी) आणि एक तरुण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने जळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघातात एका इलेक्ट्रिक दुचाकीलाही धडक बसली असून त्यावरील तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेनंतर रामानंदनगर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून फरार अल्पवयीन चालकाचा शोध घेतला जात आहे. पुणे घटनेनंतर पुन्हा अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.