शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'जिवंत सातबारा मोहीम' म्हणजे काय? तुमची अडचण कायमची कशी दूर होईल, पाहा!

Published : Dec 09, 2025, 07:24 PM IST

Maharashtra Land Record Update Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने 'जिवंत सातबारा मोहीम' सुरू केली आहे, ज्याद्वारे सातबारा उताऱ्यांवरील जुन्या व अनावश्यक नोंदी काढून टाकल्या जात आहेत. 

PREV
15
शेतकऱ्यांचा मोठा दिलासा!

मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या सातबारा उताऱ्यावर साठलेल्या जुन्या, कालबाह्य आणि अप्रासंगिक नोंदींमुळे रोज नवनव्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. कर्जमंजुरीमध्ये होणारा विलंब, जमिन व्यवहारात अडथळे, आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यात निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे शेतकऱ्यांची त्रस्त अवस्था झाली होती. ही समस्या कायमची दूर करण्यासाठी महसूल विभागाने मोठे पाऊल उचलले असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार ‘जिवंत सातबारा मोहीम’ या उपक्रमाचा दुसरा टप्पा संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आला आहे. 

25
या योजनेचा उद्देश नेमका काय?

या मोहिमेचा मुख्य हेतू सातबारा उताऱ्यांवरील जुनी व निरुपयोगी नोंदी हटवणे, मृत खातेदारांची नावे कमी करून कायदेशीर वारसांची अद्ययावत नोंद करणे आणि जमीन नोंदी अधिक स्पष्ट, पारदर्शक व विश्वासार्ह बनवणे हा आहे.

तलाठ्यांना फेरफार नोंदी बारकाईने तपासून जुने बोजे, अनावश्यक शेरे आणि काळाच्या ओघात अर्थहीन ठरलेला मजकूर काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून पहिल्या टप्प्यात फक्त आठ दिवसांत आठ लाखांहून अधिक सातबारा उताऱ्यांमध्ये वारस नोंदी पूर्ण करण्यात आल्या आहेत. 

35
२२ लाख उतारे करण्याचे लक्ष्य

महसूलमंत्री बावनकुळे यांनी राज्यभरातील तब्बल २२ लाख सातबारा उतारे अद्ययावत करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. प्रत्येक गावात किमान ५० उताऱ्यांवर सुधारणा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मृत खातेदारांची नावे वगळून प्रत्यक्ष वारसांची नोंद केल्याने जमिनीच्या मालकीबाबत उद्भवणारा गोंधळ कमी होईल आणि भविष्यातील कायदेशीर वाद टळतील. 

45
शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय, पाणंद रस्ते योजना

शेतात सहज ये-जा करता यावी, शेतीमाल व कृषी अवजारे वाहून नेणे सोपे व्हावे यासाठी शासनाने ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवली जातील, रस्त्यांची मोजणी व पुनर्रचना करण्यात येईल. यामुळे शेतात पोहोचणे सोपे होईल आणि शेतीसंबंधित कामकाज अधिक सुरळीत पार पडेल. 

55
एकूण परिणाम, शेतकऱ्यांचा प्रवास अधिक सुलभ

‘जिवंत सातबारा मोहीम’ आणि पाणंद रस्ते योजना यांच्या अंमलबजावणीनंतर शेतकऱ्यांचे दस्तऐवजीकरण सुटसुटीत होणार असून, कर्ज, जमीन व्यवहार आणि शासकीय योजना यामध्ये होणारे अडथळे मोठ्या प्रमाणात दूर होणार आहेत.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories