
मागील दोन दिवसांपासून पावसाने चांगला जोर पकडला असून कोकण, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ३० जून रोझी हवामान खात्याने मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं दिसून आलं.
२८ जून आणि २९ जून रोजी मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. चेंबूर, सायन, कुर्ला, वांद्रे आणि मालाड या भागांमध्ये पावसाच्या सरी जोरात कोसळल्या. अनेक ठिकाणच्या बस उशिराने धावत होत्या आणि स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. आज ३० जुन रोजी हवामान ढगाळ असून सकाळपासून पावसाच्या सरी सुरु झाल्या आहेत.
दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे अशी सूचना हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. मुंबईमध्ये शाळेतील विद्यार्थी आणि कामगार वर्गाला काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आलं.