
Earthquake Maharashtra : महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा भागात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी सुमारे ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास वाशिम, यवतमाळ आणि नांदेड या भागांमध्ये जमिनी हलल्याचा अनुभव नागरिकांना आला. या घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वाशिम शहर आणि परिसरात सकाळी ८:४५ वाजता सौम्य धक्का जाणवला. काही भागांतील नागरिकांनी घरामध्ये कंप जाणवल्याचे सांगितले.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी परिसरातही त्याच सुमारास भूकंपाचे हलके धक्के जाणवले. स्थानिकांनी भूगर्भातून आवाज आल्याचेही सांगितले.
नांदेड शहर आणि आसपासच्या भागात ८ वाजून ४६ मिनिटांनी सौम्य धक्का जाणवला. नागरिकांनी काही क्षण भीतीने घराबाहेर धाव घेतली.
सुदैवाने या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तीय नुकसान झाल्याचे वृत्त नाही. काही वेळानंतर परिस्थिती सुरळीत झाली.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून (NCS) अद्याप भूकंपाची तीव्रता आणि केंद्रबिंदू याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र नागरिकांच्या अनुभवांनुसार हा धक्का अत्यंत सौम्य होता.
विदर्भ-मराठवाडा हा भूकंपप्रवण भाग मानला जात असल्याने अशा सौम्य धक्क्यांची नोंद अधूनमधून होत असते. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.