
Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दिलासा देणाऱ्या अवकाळी पावसाने आता माघार घेतल्याचे चित्र दिसत आहे. मात्र पावसाचे संकट ओसरत असतानाच उष्णतेचा कडाका वाढण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा इशारा दिला असून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसामुळे तापमानात घट झाली होती. मात्र आता हवामान कोरडे होत असून कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवसांत उष्णतेचा तीव्रतेने अनुभव येणार असून उन्हाचे चटके वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तापमानात मोठी वाढ होणार आहे. काही भागात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता असून, विदर्भ, मराठवाडा आणि जळगाव पट्ट्यात उष्णतेचा सर्वाधिक फटका बसू शकतो.
सध्या राज्यातील तापमान 35 अंशांच्या आसपास असले तरी येत्या काळात 5 ते 6 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये तापमान 34 ते 38 अंशांदरम्यान राहणार असले तरी आर्द्रतेमुळे जाणवणारी उष्णता अधिक असेल. त्यामुळे नागरिकांना दमट हवामान आणि चिकचिक यांचा त्रास सहन करावा लागू शकतो.
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उन्हापासून संरक्षण करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. विशेषतः मुंबईसारख्या शहरांमध्ये दमट उष्णतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.