'पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या तरुणाईसाठी नवा अध्याय लिहित आहेत'; आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विठुरायाच्या चरणी प्रार्थना

Published : Jul 25, 2026, 10:30 AM IST
CM Devendra Fadnavis

सार

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शेतकरी, पंढरपूर कॉरिडोअरचे काम अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर मीडियाशी संवाद साधला.

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील तरुणाईसाठी नवा अध्याय लिहित असल्याचे म्हटले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याला विठुरायाचा आशीर्वाद लाभावा, अशी प्रार्थना केली. तसेच त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, पंढरपूर कॉरिडोअर, विद्यार्थी आंदोलन आणि राजकीय घडामोडींवरही सविस्तर भाष्य केले.

‘मोदी देशाच्या तरुणाईसाठी नवा अध्याय लिहित आहेत’

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील तरुणाईला दिशा देण्यासाठी आणि त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवा अध्याय लिहित आहेत. या कार्यासाठी विठुरायाचा आशीर्वाद त्यांना लाभावा, अशी प्रार्थना त्यांनी महापूजेदरम्यान केली.

 

 

‘राज्यात चांगला पाऊस पडो, शेतकरी सुखी होवो’

विठ्ठल हे सर्वसामान्यांचे दैवत असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, आषाढीची पूजा ही खरीप हंगामाच्या सुरुवातीला होते. राज्यात भरपूर पाऊस पडावा, खरीप हंगाम चांगला यावा आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद व समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना त्यांनी विठुरायाच्या चरणी केली.

राज-उद्धव ठाकरे यांच्या मोर्चावर प्रतिक्रिया

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चाबाबत विचारले असता, लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे फडणवीस म्हणाले. मात्र, या मोर्चाचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी थेट संबंध नाही.पण राजकीय भूमिका मजबूत करण्याचा तो प्रयत्न असल्याचे त्यांनी सूचित केले. तरीही अशा लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनांना शुभेच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी आंदोलनात 'राजकीय हस्तक्षेप' असल्याचा दावा

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना वेगळ्या आहेत. मात्र काहीजण राजकीय हेतूने आंदोलनात सहभागी होत आहेत. तसेच अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न  केला जात आहे. सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेत सरकारशी संवाद साधल्याचा उल्लेख करत शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

पंढरपूर कॉरिडोअरचे काम यंदाच सुरू होणार

पंढरपूर कॉरिडोअर प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकल्पाचे काम यावर्षी सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागेल. बहुतांश नागरिकांच्या शंका दूर झाल्या आहेत. उर्वरित प्रश्नही लवकरच निकाली निघतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंढरपूरचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्याचा सरकारचा संकल्प

शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पादन खर्चाचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, मोफत वीज, ठिबक सिंचन, सौरपंप, जलव्यवस्था आणि यंत्रसामग्रीवरील अनुदान यांसारख्या योजनांद्वारे सरकार मदत करत आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आणि 'महाविस्तार एआय'च्या माध्यमातून उत्पादन खर्च 25 टक्क्यांनी कमी करून उत्पादन वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पुणे-सातारा घाटमाथ्यावर अतिवृष्टी, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात पावसाचा जोर; या जिल्ह्यात केला रेड अलर्ट जारी, पावसाची उघडीप कुठं राहणार?