
पुणे : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाला आता पूर्णपणे वेगळे वळण मिळाले आहे. ज्या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, त्या प्रकरणात खुद्द त्या तरुणीनेच समोर येत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "माझं कुणीही अपहरण केलेलं नाही, मी माझ्या मर्जीने गेले आहे," अशी स्पष्ट कबुली तरुणीने एका व्हिडिओद्वारे दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी भिगवण परिसरातून या तरुणीचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. आई आणि भावाच्या डोळ्यात तिखट टाकून जहीर शेख आणि अयान शेख यांनी तिचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या, पुणे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला होता आणि आज 'भिगवण बंद'ची हाकही देण्यात आली होती.
वातावरण तापलेले असतानाच संबंधित तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात तिने म्हटले आहे की,
प्रेमसंबंधांची कबुली: "ज्या मुलावर अपहरणाचा आरोप होत आहे, त्याच्याशी माझे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत."
अपहरणाचा दावा खोटा: "माझ्या डोळ्यात चटणी टाकून मला नेल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. मी माझ्या स्वमर्जीने घराबाहेर पडले आहे."
राजकीय आरोपांवर स्पष्टीकरण: "काही राजकीय पुढाऱ्यांनी केलेले अपहरणाचे आरोप खोटे असून मी सुरक्षित आहे."
तरुणीच्या या खुलाशानंतरही परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. हिंदू संघटनांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या प्रकरणात कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जात आहे. "कोणीही सोशल मीडियावरून अफवा पसरवू नये किंवा धार्मिक तणाव निर्माण होईल असे कृत्य करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल," असा इशारा पोलिसांनी दिला आहे.